शबनम न्यूज | अहमदाबाद
वेस्ट इंडिजवर सहा गड्यांनी मात करत भारताने एकदिवसीय मालिकेचा विजयाने प्रारंभ केला. तसेच मोठ्या दिमाखात भारताने आपल्या १००० व्या सामन्यातील विजय साजरा केला. विंडिजने दिलेल्या १७६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या २७ षटकातच पूर्ण केला. या विजयात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत कर्णधाराची भूमिका चोखपणे पार पाडली. आपल्या नेतृत्त्वाखाली संघ आक्रमकपणे प्रतिस्पर्ध्यास चितपट करेल असा संदेश जणू त्याने आपल्या खेळीतून दिला. या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही पातळीवर सरस कामगिरी बजावत विंडिजला सर्वपातळ्यांवर नामोहरण केले.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येत आहे. या सामन्याच्या निमित्ताने भारत आपला १००० वा एकदिवसीय सामना खेळत आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय चांगलाच लाभदायक ठरला.