महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगरपरिषद आळंदी तर्फे आयोजन
शबनम न्यूज : आळंदी (दि.१३ फेब्रुवारी) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आळंदी येथे इंद्रायणी घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे शनीवार,१२ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर, महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे विसर्जन झाले. त्यातील एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले होते. त्याची स्मृती म्हणून रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. गेली ७४ वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.
यावर्षी सुद्धा हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इंद्रायणी नदीच्या घाटावर सकाळी ठीक साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन, विश्वस्त डॉ. मच्छिंद्र गोर्डे, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, हभप श्यामसुंदर महाराज, आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष वैजयंती उमरगेकर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, देवराम घुंडरे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, गणपतराव कुऱ्हाडे, तुषार झरेकर, सचिन चव्हाण, संस्थेचे कर्मचारी, शांतीदलाचे आणि युक्रांदचे कार्यकर्ते, गांधी प्रेमी नागरिक आदी उपस्थित होते.
सुरवातीला सकाळी ८.३० वाजता डॉ कुमार सप्तर्षी यांचे हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सौ. मोहिनी पवार, अभय देशपांडे यांचा सर्वधर्म प्रार्थना आणि भजने गायनाचा कार्यक्रम झाला.