भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावरील व्याख्यानमालेचा समारोप
शबनम न्यूज : पुणे (दि.१३ फेब्रुवारी) :- ‘भास्कराचार्यांच्या लीलावती या गणितावरील ग्रंथातून भारतीय गणिताच्या प्रतिभेची चुणूक पाहायला मिळते.जपानमध्येही अनेक दशकापासून भाषांतरित पुस्तकातून त्याचा अभ्यास होतो.भारतात शालेय विद्यार्थ्यांपर्यंत या गणित संकल्पना पोहोचल्या पाहिजेत,भारतीय गणित ग्लोबल होण्यासाठीही अधिक परिश्रम घेतले पाहिजेत’,असे प्रतिपादन जपानच्या सायन्स कौन्सिलचे माजी सदस्य प्रा.मिशिओ यानो यांनी केले.
गणिताची गोडी निर्माण करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या ‘अंकनाद-गणिताची सात्मीकरण प्रणाली‘ द्वारे आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स तर्फे आयोजित भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावरील वर्षभर चाललेल्या व्याख्यानमालेचा समारोप रविवार,१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता झाला.
या समारोपाच्या सत्रात प्रा. मिशिओ यानो यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.गणित अभ्यासक प्रा.सुधाकर आगरकर यांनी वर्षभर या मासिक व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले.दरमहा २ याप्रमाणे एकूण २४ सत्रातुन त्यांनी लिलावतीमधील गणितज्ञानाचा परिचय करून दिला.आजच्या शेवटच्या सत्रात त्यांनी कुट्टक व्यवहार,संख्याभेद,अंक पाश (परम्युटेशन,कॉम्बिनेशन)संकल् पनांचा परिचय करून दिला.
समारोपाच्या सत्राला जपानच्या सायन्स कौन्सिलचे माजी सदस्य प्रा.मिशिओ यानो आणि विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर,मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संचालक मंदार नामजोशी,समीर बापट,वैशाली लोखंडे,गणिताचे अभ्यासक,विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.आसावरी बापट यांनी श्लोकांचे वाचन केले.
डॉ.सुधाकर आगरकर म्हणाले,’भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून या व्याख्यानमालेकडे पाहिले पाहिजे.भास्कराचार्यांनी त्यांच्या लीलावती या मुलीसाठी गणिताचा कल्पवृक्ष ‘लीलावती’नावाने लिहिलेल्या ग्रंथातून लावला आणि जगभर त्याची ख्याती आहे.संवादातून,काव्यमय श्लोकातून भास्कराचार्य गणितासारख्या विषय मांडतात,हे जागतिक शिक्षण क्षेत्रातील अद्भुत उदाहरण आहे.
भास्कराचार्यांनी गणित सोडवून घेण्याच्या पडताळ्याच्या अभिनव पद्धती निर्माण केल्या. प्रत्येक वेळी उत्तराची खात्री करून घेतली जात होती.१८ व्या शतकापासून लीलावती ‘ ग्रंथाची इंग्रजीत भाषांतरे सुरु झाली. भारतीय तसेच परदेशी संशोधकांनी ही भाषांतरे केली . १८८९ मध्ये संस्कृत लिलावतीचे मराठीत भाषांतर झाले. भास्कराचार्यांनी पुस्तकात एकही गणित सोडवून दाखवलेले नाही .तयार उत्तरे दिली नाहीत . मात्र,पद्धती शिकवल्या . जपानी संशोधक म्हणतात त्याप्रमाणे भारतातील घराघरात या ग्रंथाचे वाचन व्हायला हवे .गणित हे गंधहीन ,रस हीन गोष्ट नाही हे भास्कराचार्य यांच्यामुळे जगाला लक्षात आले,असेही डॉ.आगरकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,’उदाहरणे सोडविण्याच्या एकाच पद्धतीचा आग्रह न धरता अनेक पद्धतींना मुभा देऊन भास्कराचार्यांनी गणितात, शिक्षण पद्धतीत स्वातंत्र्य आणि मोकळेपणा आणला,स्वातंत्र्य दिल्यावर दिशा चुकणार नाही यासाठीही ते मार्गदर्शन करीत राहिले.शैक्षणिक मानसशास्त्र जपणारा ,कौतुकाची थाप पाठीवर मारणारा संवाद त्यांनी साधला ,त्यामुळे गणिताची भाषा सोपी झाली. अध्यापनाच्या दृष्टीने त्यांनी बाराव्या शतकात ज्या सूचना केल्या, त्या आजही उपयुक्त ठरतात’
मंदार नामजोशी म्हणाले,’अंकनाद हा गणिताला आणि संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे.गणितात यश मिळविणाऱ्यांसाठी जगभर व्यासपीठे आहेत,पण गणिताची भीती घालविण्यासाठी एकही व्यासपीठ नाही.गणिते अगदी सहजतेने पार पाडण्यासाठी गणिताची साधने जाणून घेणे अनिवार्य आहे.अशा साधनांपैकी एक म्हणजे मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने गणित आत्मसात करण्यासाठी विकसित केलेली’अंकनाद प्रणाली’ आहे. हे पूर्ण संख्या आणि अपूर्णांकांच्या संगीत पाढ्याशी संबंधित आहे.”लीलावती” सारख्या प्राचीन साहित्यात वापरल्या जाणार्या गणिती संकल्पनांवर आधारित व्याख्यानमाला,पाढे स्पर्धा आणि गणितालय सारख्या उपक्रमातून आम्ही कार्यरत आहोत.
लीलावती ग्रंथाविषयी :
भास्कराचार्याचा लीलावती हा ग्रंथ सर्वात लोकप्रिय आहे.गणित मनोरंजक करून कसे शिकवावे याचा तो एक आदर्श नमुना आहे.त्यामुळे लीलावतीने अगोदरच्या सर्व गणित ग्रंथांना मागे सारून अग्रस्थान मिळविले.पुढे सुमारे ६०० वर्षे भास्कराचार्याचे लीलावती आणि बीजगणित हे ग्रंथ संपूर्ण भारतभर गणित शिकवण्यासाठीची पाठ्यपुस्तके झाली होती.या ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्ये लिहिली,अनेक परदेशी भाषांत त्याची भाषांतरे झाली.सन १६१२ साली लीलावतीचे पर्शियन भाषेत भाषांतर झाले.हेन्री थॉमस कोलब्रुक या ब्रिटिश विद्वानाने सन १८१७ साली लीलावतीचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले.
‘अंकनाद ‘ अॅप विषयी :
‘अंकनाद’ अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी या उपक्रमांची आणि ‘गणितालय’ या उपक्रमांची माहिती दिली.’अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं अॅप आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही.गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ‘अंकनाद’ तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते,गणितालय उपक्रम,पाढे पाठांतर स्पर्धा सलग दोन वर्ष घेतल्या जात आहेत,असे त्यांनी सांगितले.’
Advertisement
Advertisement
Advertisement