शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ फेब्रुवारी) :- बेकायदेशीर दुचाकी बंद करणे, रिक्षा चालक मालक यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करणे आदीसह विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक मालक पुण्यातील आरटीओ कार्यालयावर आंदोलन छेडणार आहेत. सोमवारी (दि. 14) रोजी हे आंदोलन सुरू होणार आहे. या मध्ये पुणे व पिंपरी मधील रिक्षा चालक मालक सहभागी होणार आहेत. पिंपरीतुन सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष, व ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे नेते बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पिंपरी येथे सकाळी 10 वाजता पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालक-मालक एकत्र येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुण्याकडे आंदोलणासाठी रवाना होणार आहेत. या मध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत, आम आदमी रिक्षा संघटना, शिवनेरी रिक्षा संघटना, सेवा सर्थी रिक्षा संघटना, पुणे रिक्षा फेडरेशन, महाराष्ट्र नवनिर्माण वाहातुक सेना, आदींचा सहभाग असणार आहे.
बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, पिंपरी-चिंचवड, पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे दुचाकी सुरु असून आहेत. ओला, उबेर, रॅपिडो या बेकायदेशीर ॲपमुळे रिक्षा व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या विरोधात पुणे, पिंपरी शहरातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत.
कोविडमुळे अगोदरच त्रस्त व मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांना आर्थिक फटका आहे. रिक्षा चालकांचे हप्ते थकले असून त्यांना हप्ते भरणे ही अवघड झाले आहे. रिक्षा चालक घर कसे चालवणार ? मुलांचे शिक्षण मुलांची फी अशा असंख्य प्रश्नांनी ते त्रस्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्यासाठी विविध उपाय योजना राबवण्याची गरज आहे. परंतु सरकार मात्र गोरगरिबांना आपाआपसामधे लढवत असून ओला, उबेर सारख्या भांडवलदार कंपणींना पाठीशी घालत आहे. यामुळे रिक्षाचालकांचे जगणे मुश्किल झाले आहे. यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय शिल्लक नाही.
बेकायदेशीर टू व्हीलर बाइक बंद झाली पाहिजे. रिक्षाचालक मालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे. वाढीव दंड रद्द झाला पाहिजे. मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे. यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.रिक्षाचालक मालकांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील या वेळी बाबा कांबळे यांनी केले आहे.