शबनम न्यूज : पुणे (दि.२२ फेब्रुवारी) :- मराठा टायगर फोर्सच्या माध्यमातून प्रतिवर्षी वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात येते. या निमित्ताने घरोघरी शिवजयंती स्पर्धा आयोजित करण्यात येते व मोठया प्रमाणावर बक्षिसे देण्यात येतात, त्याचप्रमाणे समाजात विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मराठा टायगर फोर्स आयोजित बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान सोहळा दि.20 फेब्रुवारी रोजी पार पडला सोहळ्यात इंजि.कैलास वडघुले यांना छत्रपती संभाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
बालरोग तज्ञ डॉ.जितेंद्र देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्कार, ह.भ.प.सौ.रेश्माताई काकड़े यांना राष्ट्रमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्काराने गौरविण्यात आलेले कैलास वडघुले हे डिफेन्सच्या दारुगोळा कारखान्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते शिवप्रेमी, शिवचरित्राचे अभ्यासक आहेत. शिवरायांचा इतिहास घरोघरी पोहोचविण्यासाठी त्यांनी शिवचरित्रावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्याने दिलेली आहेत. शिवकालीन किल्ले भ्रमंतीच्या माध्यमातून किल्ले संवर्धनासाठी अनेक मोहिमा, कुटुंबाचे आर्थिक नियोजन या विषयावर पुणे महानगरपालिकेसह अनेक कंपन्या तसेच संस्थांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यानांच्या रूपाने मार्गदर्शन केले आहे. त्यांनी मराठा सेवा संघाची विविध पदे भूषविली असून राजर्षी शाहू महाराज सोशल फौंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण, लायब्ररी आणि पुस्तक वाचन उपक्रम, शाळा सुधार योजना, राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सवा अंतर्गत सामाजिक पुरस्कार वितरण असे विविध कृतिशील उपक्रम राबविले जातात.
राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीत डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून गावागावात मोफत वैद्यकीय कॅम्प. त्याचप्रमाणे जनावरांच्या डॉक्टरांच्या माध्यमातून प्राण्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले होते. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एका कोलकत्याच्या उद्योजकाच्या मदतीने पवन मावळातील किल्ले विसापूरच्या पायथ्याशी वसलेले महागाव आणि सावंतवाडी, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची जन्मभूमी असलेल्या भोर तालुक्यातील हिरडस मावळातील रायरेश्वर, केंजळगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोर्ले व ताम्हिणी घाटाच्या निसर्गाच्या कुशीत वसलेले वाठार. शिरूर तालुक्यातील घोलपवाडी, बाळोबाचीवाडी, होमाचीवाडी आणि टाकळी भीमा अशा आठ शाळांना मिळून 1 कोटींचे शालोपयोगी फर्निचर व वस्तू या शाळांना मिळवून देण्यात आल्या आहेत.
समाज कार्याची पावती म्हणून त्यांना अनेक ठिकाणी मान सन्मान प्राप्त झाले आहेत यामध्ये प्रामुख्याने २०१५ सालचा राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार २०१६ सालचा मराठा सेवा संघाचा मराठा भूषण पुरस्कार. २०१७ सालचा बळीराजा फाउंडेशनचा बळीराजा गौरव पुरस्कार.२०१८ सालचा राष्ट्र प्रथम पुरस्कार. २०१८ व २०१९ असे सलग दोन वर्षे मराठी देशा फाऊंडेशन व गडवाट आयोजित दुर्गजागरचे मानाचे पान. २०२० सालचा माजी सैनिक संघाचा सैनिक मित्र पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. २०२२ सालचा मराठा टायगर फोर्सचा छत्रपती संभाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष इंजि.राजेंद्र दुबल, पुणे शहर अध्यक्ष रघुवीर तुपे, मराठा क्रांती मोर्च्याचे राज्य समनव्ययक रघुनाथ चित्रे पाटील, मराठवाडा बहुउद्देशीय विकास संस्थेचे महेश टिळे पाटील, मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील, सतीश काळे, हडपसर येथील जेष्ठ नेते निलेशदादा मगर, सतिषभाऊ जगताप, सौ.सविता मोरे, कैलासदादा आवारी, उपस्थित होते.