शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी) :- “समाजाचे हित साधते ते साहित्य, ही साहित्याची व्याख्या ‘तू माझा सांगाती’ ही साहित्यकृती पूर्ण करते!” असे मत ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी मंगळवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री गजाननमहाराज मंदिर, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. संवेदना प्रकाशन निर्मित आणि पंजाबराव मोंढे लिखित ‘तू माझा सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना किसनमहाराज चौधरी बोलत होते. पारायणकार डॉ. गजानन खासनीस, ह.भ.प. बब्रुवानमहाराज वाघ, प्राधिकरण गजाननमहाराज मंदिराचे अध्यक्ष रामभाऊ पिसे, सामाजिक कार्यकर्त्या कांताबाई मोंढे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समरसता साहित्य परिषदेचे निवडक प्रतिनिधी तसेच पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. याप्रसंगी ह.भ.प. बब्रुवानमहाराज वाघ यांनी आपल्या मनोगतातून, “जोपर्यंत संतांची, श्रींची कृपा होत नाही तोपर्यंत माणसाच्या हातून सत्कर्म घडत नाही. हे लेखन म्हणजे त्याच कृपेचा भाग आहे!” असे विचार मांडले. लेखक पंजाबराव मोंढे यांनी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करताना, “चिंचवड ते शेगाव या सुमारे पाचशेहून अधिक किलोमीटरच्या पायी प्रवासातील विलक्षण अनुभूती म्हणजे ‘तू माझा सांगाती’ होय!” अशी भावना व्यक्त केली.
ह.भ.प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “चिंचवड येथील गजाननमहाराज मंदिर ते शेगावचे गजाननमहाराज मंदिर या पंजाबराव मोंढे यांच्या वारीमागे ईश्वरी प्रेरणा आहे. वैराग्य आणि अध्यात्मातील अधिकार या दोन गोष्टींमुळे माणूस संतपदापर्यंत पोहचतो. श्री गजाननमहाराज हे त्या प्रकारातील सिद्ध संत होते. त्यांच्या दर्शनाच्या ध्यासातून केलेले हे लेखन समाजापर्यंत पोहचले पाहिजे!” मोंढे आणि संवेदना परिवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. समृद्धी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशक नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.