शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी) :- दिल्लीच्या धर्तीवर शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत , अशी मागणी कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना अध्यक्ष सुरज गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि शिक्षणाची गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधांसाठी शालेय शिक्षण विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, आज आपण जर पाहिले तर राज्यामध्ये सरकारी शाळांचा पट कमी होत असून आपल्या राज्यातील गोरगरीब सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी शैक्षणिक दर्जा सुधरवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे व हे काम महाविकास आघाडी करू शकते असा ठाम विश्वास मला आहे.
ज्याप्रमाणे दिल्लीच्या शिक्षण मंडळाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी म्हणजेच International Baccalaureate सोबत करार केला आहे. International Baccalaureate चे जगभरातील १५९ देशांमधील शाळांसोबत त्यांचा करार झाला असून यात अमेरिका, जपान, कॅनडा अशा देशांचा समावेश आहे, दिल्लीतील शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट आहे, अशाप्रकारे आपल्या राज्य सरकारने दिल्लीच्या धर्तीवर प्रयत्न करावेत अशी माझी आपणास विनंती आहे.
सध्या देशात शिक्षण क्षेत्रात श्रीमंत आणि गरीब वर्गासाठी शाळा आहेत. शिक्षणात क्रांतिकारी बदल करण्यासाठी सरकारी शाळा, तेथील सुविधा यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे , यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवून तेथील अभ्यासक्रमाचा व पायाभूत शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला पाहिजे. यामुळे सरकारी शाळांमधील निकालात सुधारणा निश्चितपणे होईल. आंतरराष्ट्रीय बोर्डाशी करार केल्याने परदेशातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्या राज्यात येऊ शकतील. व सुरुवातीला राज्यातील काही शाळांमध्ये याची अंमलबजावणी केली तसेच त्यांच्याद्वारे शाळांमधील शिक्षकांना परदेशातील तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण दिले गेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला गेला. आपल्या राज्यातील शाळांमध्ये कोणत्या सुविधा नाहीत, याचा आढावा घेऊन त्यात सुधारणा केली तर यामध्ये निश्चितच अमुलाग्र बदल घडेल. यामुळे आपल्या राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळेल.
अशाप्रकारे राज्याला आणि देशाला एक नवा आदर्श मिळेल. राज्य सरकारने यामध्ये ठोस पावले उचलण्याची गरज आहे, आज सर्वसामान्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये जावे लागते, खूप पैसा ही मोजावा लागतो हे जर राज्य सरकार द्वारे केले गेले तर निश्चितच सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. हे काम महाविकास आघाडी सरकार करू शकते याची मला पूर्णपणे जाणीव आहे. असे ही सदर निवेदनात सुरज बाबर यांनी नमूद केले आहे.