शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०४ मार्च) :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर भा.द.वि. च्या कलमानुसार कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शंकर अवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिनांक २७/२/२०२२ रोजी औरंगाबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात “समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोणी विचारले नसते” असे जाहीर वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य सर्व माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. हे वक्तव्य निखालस खोटे दिशाभूल करणारे, समाजात तेढ निर्माण करणारे, इतिहासाची मोडतोड करणारे व छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास होते याला शिवकाळातील मूळ अस्सल साधने राधामाधवविलासचंपू, प्रणालपर्वतग्रहण आख्यान, जेधे शकावली, बुद्धभूषण, शिवभारत या ऐतिहासिक ग्रंथात रामदासांचा साधा उल्लेख देखील नाही. अलीकडच्या काळात बखरी, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, पाठ्य पुस्तके शिल्पे याद्वारे हा खोडसाळ खोटा प्रचार करून समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुस्थानी असल्याचे वारंवार जबरदस्तीने ठसवण्याचा प्रयत्न झाला आहे. या खोडसाळ प्रचाराचे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वा सी बेंद्रे, त्र्यंबक शंकर शेजवलकर, डॉ.जयसिंगराव पवार, डॉ. आ. ह. साळुंखे, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, श्रीमंत कोकाटे, इंद्रजित सावंत आदी अभ्यासकांनी यापूर्वीच वैचारिक पद्धतीने अस्सल पुराव्याच्या आधारे खंडन केलेले आहे. दि. १ मार्च २००८ रोजी दासनवमी निमित्त समर्थ विद्या प्रसारक मंडळ अहमदनगर यांनी काढलेल्या प्रचार फेरीत छत्रपती शिवाजी महाराज रामदासांच्या पाया पडताना असा जिवंत देखावा सादर केला होता. त्यावर शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी आक्षेप घेत समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी, सचिव श्री विश्वेश भालेराव व मुख्याध्यापिका सौ दमयंती कुलकर्णी यांच्यावर भा.द.वि. कलम २९५(अ)३४ अन्वये गु.र.न.आय८०/२००८ कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन घेऊन मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन गुन्ह्याच्या तपासात पुढील आदेश होईपर्यंत मा.उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली होती. सदरच्या प्रलंबित खटल्यांची सुनावणी १६ जुलै २०१८ रोजी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचे मा.न्यायाधीश टी.व्ही. नलावडे व मा न्यायाधीश के एल वडणे यांच्यासमोर झाली. मा उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सदरचा गुन्हा रद्द करण्याची तिन्ही आरोपींची मागणी फेटाळून लावली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर विराजमान आहेत. ते घटनात्मक पदावर बसून एका विशिष्ट विचारधारेचा प्रसार-प्रचार करताना दिसतात. ते अनेकदा बेताल, निराधार, खोटी वादग्रस्त विधाने करण्यास प्रसिद्ध आहेत. त्यांनी औरंगाबादच्या सभेत “समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोणी विचारले नसते” असे जाहीर वक्तव्य करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा घोर अवमान केलेला आहे. त्यांनी शिवभक्तामध्ये संभ्रम निर्माण करून खोटा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात समाजात जाती व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. त्यांचे हे वक्तव्य समाजविघातक व सामाजिक शांततेला बाधा आणणारे कृत्य आहे. त्यामुळे अशा प्रकारची कृत्य करणारी व्यक्ती कितीही मोठी असू द्या त्याला पायबंद बसलाच पाहिजे म्हणून माझी आपल्याकडे मागणी आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर भा द वि कलमान्वये कठोरात कठोर कलमे लावून फौजदारी कारवाई करावी,असे ही सदर निवेदनात मारुती भापकर यांनी नमूद केले आहे.