८ मार्च-जागतिक महिला दिन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ मार्च) :- समाजावर सुसंस्कृतपणे संस्कार करणारी माता असते, तिच्या ह्रदयी प्रेमाचा पाझर असतो. प्रेमाने ती सर्व संकटांवर विजय मिळवू शकते. अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य प्रत्येक स्त्री मध्ये असते. तिला तिची सक्षमता सिध्द करण्यासाठी संधीची आणि कुटूंबांतून पाठबळ मिळण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने समाजाला आजही या स्त्री शक्तीची म्हणावी अशी ओळख झालेली नाही. यासाठी तिच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी अनादी काळापासून आजपर्यंत तिची लढाई चालू आहे.
‘ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी आणि तिच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक सक्षमतेसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले.
महिला दिनाचे औचित्य साधून मानिनी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या बैठकीत डॉ. भारती चव्हाण उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, स्त्रीचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे पुरुषी मानसिकता. मग तो जाहिरातीतले प्रदर्शन असो किंवा ओंगळवण्या गलिच्छ चित्रफिती असो. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू या मानसिकतेतून आजही बाहेर न पडणारी पुरुषी मानसिकता.
अमेरिका युरोपसह जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्रियांना २० व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध महिलांच्या मतदानाच्या हक्कांसंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन ची स्थापना १८९० मध्ये करण्यात आली. सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी आणि कामगार क्षेत्रातील महिला कामगारांच्या हक्कासाठी १९०७ साली पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरवली गेली. अनेक आंदोलने झाली, मतदानाच्या हक्कासाठी अनेक मोहिमा उघडल्या गेल्या, ऐतिहासिक निदर्शने झाली, त्याचा परिणाम म्हणून १९१८-१९ मध्ये या मागण्यांना यश मिळाले. अंतरराष्ट्रीय परिषदेच्या ठरावानुसार ८ मार्च हा महिलादिन म्हणून साजरा करण्यात आला.
मुंबई येथे ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला तर पुणे येथे ८ मार्च १९७१ रोजी महिलादिन महिलांच्या हक्कासाठी एक मोठा मोर्चा काढून साजरा करण्यात आला. पुढे युनोने १९७५ वे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्या नंतर स्रियांच्या समस्यांना व्यासपीठ मिळत गेले. स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजाच्या समोर येत गेल्या. महिला संघटनांना बळकटी आणण्याबद्दलच्या सामाजिक, आर्थिक, राजकिय, सांस्कृतिक परिस्थिती नुसार काही संघटनांचे स्वरूप बदलले तशा संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.
त्यानंतर तर ८ मार्च हा सर्व स्तरांमध्ये जागतिक महिलादिन म्हणून उत्साहाने साजरा होऊ लागला. किंबहुना ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, राज्यशासन, केंद्रशासन तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवाभावी महिला संस्था यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार, सामाजिक आणि कौटुंबिक सुरक्षा आणि महिलांचे उदात्तीकरण या हेतूने ८ मार्च हा दिवस साजरा करणे उचित ठरेल.
जगातल्या सर्वांत सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळ्याला नख लावण्याचे दृष्ट कार्य केले जाते तेही जन्मजात आईबापाच्या संमतीने. या सारखे दुर्दैव कोणते ?
या जगात प्रवेश केल्यावरही घरातल्या जवळच्या नातेवाईकांपासून कोणीही तिच्यावर अत्याचार करून तिला रक्तबंबाळ करू शकतो. लग्न झाल्यानंतरही एक स्त्रीला दुसऱ्या स्त्री कडून होणाऱ्या स्टोव्ह च्या भडक्याने स्वप्नांची राख होते. सासू नावाची स्त्री सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का करते हे मानवजातीला आत्तापर्यंत न उलगडणारे कोडे आहे
स्त्रीचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे पुरुषी मानसिकता. मग तो जाहिरातीतले प्रदर्शन असो किंवा ओंगळवण्या गलिच्छ चित्रफिती असो. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू या मानसिकतेतून आजही बाहेर न पडणारी पुरुषी मानसिकता.
समाजातील, घरातील, बाहेरील शत्रूंना झेलत झेलत ती तिची लढाई लढत असते. खरेतर ती समाजाच्या नितीमत्तेचा कणा आहे. समाजावर संस्कार करणारी माता आहे. निसर्गाने तिला प्रेम नावाचे विलक्षण शस्त्र दिले आहे. या शस्त्राने अनेक अवघड सत्कृत्य सहजरित्या पार पाडते. तिच्या शब्दांत मंत्राचे सामर्थ्य आहे. या मंत्राने ती अग्नी फुलवू ही शकते आणि विझवू ही शकते. यावर समाजाचे अस्तित्व अवलंबून असते. परंतु दुर्दैव असे की समजाला आजही या स्त्री शक्तीची म्हणावी अशी ओळख होत नाही. या ओळखीसाठी, या अस्तित्वासाठी अनादी काळापासून आजपर्यंत तिचा लढा चालूच आहे. सामाजिक सुरक्षितता जपायची असेल तर समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन हे चित्र बदलण्याची गरज आहे.
८ मार्च-महिला दिन जवळ आला की महिला उत्सवाच्या हेतूने तयारीला लागतात. खरतर या दिवसाचा मुख्य हेतू महिला सबलीकरण….
परंतु तो साध्य होतोय का ?
आपल्या जवळची कोणती स्त्री सबळ आहे का ?
आपण स्वतः तरी सबळ आहोत का ?
नवऱ्याने सोडून दिलेल्या बायकोला समाजात स्थान आहे का ?
विधवा झालेल्या महिलेला समाजात मान मिळतो का ?
हळदीकुंकू कार्यक्रमाला विधवा स्त्रीला बोलवण्याचे धाडस कोण करते का ?
एखाद्या विनयभंग किंवा बलात्कार झालेल्या मुलीला आपण सन्मान देत का ?
महिला महिलांवर करत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबरोबरच महिलांकडून महिलांच्या होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणातही झपाट्याने वाढ होत आहे ही चिंताजनक आणि धक्कादायक बाब आहे.
स्त्रियांच्या बाबतीत समाजाची मानसिकता आजही बदललेली नाही. महिलादिन साजरा करण्याचा मूळ हेतूच अजूनपर्यंत साध्य झालेला नाही. उलट ज्या स्त्रियांना हा महिलादिवस साजरा करायचा आहे त्यांनी स्वतःच्या सोयीने महिलादिनाचा अर्थ काढलाय हेच खूप भयंकर आहे.
शासनाने “महिला शक्ती विधायक” मंजूर करून महिलांवरील अत्याचाराबाबत २१ दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाचे यावर्षीच्या जागतिक महिला दिनानिमित्त दिलेली अवर्णनीय भेटच म्हणावी लागेल.
“राज्य शासन… केंद्र शासन” दोन्हीचेही “मनःपूर्वक आभार !!!!”
जागतिक महिलादिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव !!! खरतर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्री चा. तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचा ही. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सृजनतेचाही !!!
डॉ. भारती चव्हाण
संस्थापक अध्यक्षा
मानिनी फौंडेशन.