शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ मार्च) :- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील स्वाभिमानाची खदखद…मळमळ…अन् वळवळ अचानक ज्वालामूखी होवून बाहेर पडताना दिसतेय. हा ज्वालामूखी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत निश्चितच नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुरस्कृत तर कदापि नाही. स्थानिक राष्ट्रवादीचा हा खेळखंडोबा झालायं तो ‘बॉस’ आणि कथित चाणक्याच्या आततायीपणामुळे… त्यात बळीचा बकरा ठरताहेत काही भाजपाचे स्वयंघोषित निष्ठावंत, प्रतिभावंत, जाबाज आणि तरबेज नगरसेवक. जे नगरसेवक स्वत:च्या प्रभागातील नागरिकांची अपेक्षा पाच वर्षांत पूर्ण करु शकले नाहीत किंबहुना प्रभागात फिरकलेसुद्धा नाहीत. हे धुरंधर नगरसेवक अक्षरश: बळीचा बकरा होत आहेत… रोज नवा बकरा… पकडायचा आणि भाजपाच्या वाघांची शिकार करायची… असा नित्यक्रम बॉस आणि चाणक्य जोडीने लावला आहे. यात ही जोडी जो राजकीय स्वार्थ साधायचा आहे, तो अगदी अचूक साधत आहे.
गुलामी… ज्यांच्या रक्तांत नाही, असा साक्षात्कार झालेले नगरसेवक अचानक खडबडून जागे झाले. निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपाच्या आमदारांची हुकुमशाही आठवली. प्रभागातील कामे आठवली. पळापळ झाली आणि नाराजांचा भरणा झालेले जहाज चाणक्यांच्या स्वनिर्मित किनाऱ्याला जावून पोहाचले. या काठावर बसून, मग भाजपा कसा? हुकूमशहा पक्ष… आमदार कसे चुकीचे…भ्रष्टाचार कसा फोफावला… याच्या सुरस कथा पिंपरी-चिंचवडकरांसमोर मांडण्याचा नियोजित कट शिजवला जातोय. एक-एक नाराज जहाजातून अलगद खाली उतरायचा…त्याला स्वाभिमानाची जाणीव करुन द्यायची… स्क्रिट देवून ज्ञानदान करायचे… त्यांचा पूर्ण मानवी बॉम्ब तयार करायाचा… आणि मग, अगदी पद्धतशीर पिंपरी-चिंचवडकरांसमोर फोडायचा.. ! मगरमछ के आँसू काढायचे… त्यातून मगधक्का…मुक्का… अशी आत्मपौढी मिरवायची, असेच चित्र पहायला मिळत आहे.
वास्तविक, पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी ज्या नगरसेवकांनी योगदान दिले नाही. त्यांना सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी किंवा प्रदेशातील नेत्यांनी घरचा रस्ता दाखवला पाहिजे. त्यासाठीच भाजपाने ‘नो परफॉर्मन्स नो तिकीट ’ही संकल्पना समोर आणली. त्या नियमानुसार १५ ते २० जणांचा पत्ता कट होणार आहे. ‘‘ज्यांनी आत्मचिंतन केले… मी गेल्या ५ वर्षांत काय केले?’’ त्यांच्या लक्षात आले. तिकीट वाटपात आपला कार्यक्रम होणार आहे. मग, अनेकांनी गळे काढायला सुरूवात केली. स्वाभिमान दुखावला जातोय. आमदारांची हुकुमशाही आहे. स्वातंत्र्य मिळाले नाही. असे म्हणणारे बॉस आणि कथित चाणक्याची गुलामी करायला गेले आहेत. मूळात संबंधित नगरसेवकांना गुलामीची संकल्पनाच कळली नाही. वैचारिक गुलामी सर्वात घातकी… ही बाब अनेकांच्या लक्षात आली नाही. एक-एक करीत वैचारिक गुलामीचे प्रणेते नाराज नगरसेवकांचा बळी देत आहेत. कारण, वरकरणी राष्ट्रवादीपुरस्कृत सोहळा असल्याचे भासवून पंगतीला बसवणाऱ्यांना अजितदादा पवारांनी कसलाही शब्द दिलेला नाही. यावर ‘‘ पक्षाचे काम करा… निवडणूक आली पाहू काय करायचे ते…’’असा सूचक संदेश अजितदादा देत आहेत. मात्र, आम्ही जे करीत आहोत, ते दादांच्या निर्देशानुसार… असा विचार रुजवणारे अजितदादांचे कथित हितचिंतक शिलेदार बाहुबली चित्रपटातील कटप्पाप्रमाणे पाठीत सूरा नव्हे आख्खी समशेर खुपसण्याचे महापाप करीत आहेत. ज्यावेळी ही बाब बाहुबली अजितदादांच्या लक्षात येईल. त्यावेळी या कटप्पांचा राजकीय शिरच्छेद केल्याशिवाय अजितदादा स्वस्त बसणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
प्रसिद्धीलोलूप नगरसेवकांना नामी संधी मिळाली. व्यासपीठ मिळाले. आरोप करायला पुराव्यांची गरज नसते. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला… असे आरोप करायचे… स्टंट करायचा आणि प्रसिद्घी मिळवायची… असा शिरस्ता काही दिशादर्शक आणि दूरदृष्टी असलेल्या लोकांनी घातला. मग, एक साधा प्रश्न उपस्थित झाला. पाच वर्षांत संबंधित स्वाभिमानी नगरसेवकांचा स्वाभिमान कुठे झोपला होता? २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदरांची हुकुमशाही का दिसली नाही? राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे निस्सिम प्रेम करणाऱ्यांना साधा उमेदवारही देता आला नाही. राष्ट्रवादी मुक्त पिंपरी-चिंचवड होत असताना आमदार अण्णा बनसोडे, संजोग वाघेरे, विलास लांडे यांनी राष्ट्रवादी जिवंत ठेवली. त्यावेळचे अजितदादा आणि आताचे अजितदादा फरक काहीच नाही. मग, अचानक नाराज नगरसेवकांना अजिदादांचे प्रेम, जिव्हाळा कसा आठवला? हे नाराज आणि बंडखोर नगरसेवक विलास लांडे यांनी त्यावेळी भाजपाच्या दोन्ही आमदारांना दोन हात केले होते, हे सोईस्कर विसरले. विलास लांडे यांना सक्रीय राजकारणातून अलगद बाहेर फेकून, बॉस आणि चाणक्यांनी राष्ट्रवादी प्रायव्हेट लिमिटेड केली. भाजपातील निष्क्रीय नगरसेवकांना सोबत घेवून आता महापालिका निवडणुकांमध्ये विजय सोपा करण्याचा कयास आहे. दि. १३ मार्च २०२२ रोजी महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी, १० ते १५ दिवस अगोदर राजीनामा दिल्याने कोणता पहाड तुटून पडणार आहे? असा प्रश्न आहे. अडीच वर्षांपर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी नाराजांनी राजीनामा देणे अपेक्षीत होते. भाजपाविरोधात २५ ते ३० नगरसेवक नाराज आहेत, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपाविरोधात अविश्वास ठराव आणला पाहिजे होता. पण, ते धाडस ना बॉसने दाखवले ना कथित चाणक्याला जमले. सत्ताधारी भाजपाच्या दोन्ही आमदारांनी पाच वर्षे पूर्ण निर्विवाद सत्ता सांभाळली, हे नाकारता येणार नाही.
गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादीत प्रवेशाची एक सिस्टम तयार झाली आहे. पहिल्यांदा संबंधित नगरसेवकाने नाराज असल्याचे जाहीर करायचे. त्यानंतर एका विशिष्ट व्यासपीठावर यायचे. त्याठिकाणी चर्चा आणि सल्ला मसलत करुन स्क्रिफ्ट तयार करायची. त्यानुसार व्यासपीठावर अचूक किंवा कागद पाहून बोलायचे. भाजपाचे आमदार, पक्षश्रेष्ठींवर आरोप करायचे आणि हो… भ्रष्टाचार, हुकुमशाही, स्वातंत्र्य, स्वाभिमान… असे मोठे-मोठे शब्द वारंवार उच्चारायचे… नाहीतर प्रवेश अनिश्चित… स्थानिक पातळीवर प्रसिद्घी मिळवल्यानंतर पुन्हा मुंबईला जायचे. अजित पवारांची भेट घ्यायची…अगदी रांगेत उभे राहून. मग, त्याची पुन्हा प्रसिद्धी करायची.. सगळेच खूष.
या सर्व घडामोडींत पिंपरी-चिंचवडकरांना शून्य रस आहे. तुम्ही काय काम केले? आणि काय करणार आहात? यावर लोक मते देत असतात. पण, राष्ट्रवादीने प्रचाराचे मुद्दे अक्षरश: सोडून दिले. भ्रष्टाचार जो की सिद्धच झाला नाही… त्यावर राष्ट्रवादी वेळकाढू पणा करीत आहे. राष्ट्रवादीला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण, स्वत: अजित पवार म्हणतात… आम्हाला लोकांची कामे करायची आहेत. आरोप-प्रत्यारोपात काही स्वारस्य नाही. पण राष्ट्रवादी चालवणाऱ्या बॉस आणि कथित चाणक्यांच्या ही बाब लक्षात आली नाही… त्याचे दूरगामी परिणाम पिंपरी-चिंचवडमध्ये भोगावे लागणार आहेत.