शबनम न्यूज : अहमदनगर (दि.१६ मार्च ) :- सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव गेणूजी कोल्हे (वय ९४) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी साडेचार वाजता कोपरगावमध्ये संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोपरगाव तालुक्यातील येसगांव सारख्या छोट्याशा खेडेगावातून ग्रामीण जीवनाचा बाज अंगी बाळगत कोल्हे यांनी धाडसानं सर्वच क्षेत्रात काम केले. कोपरगाव तालुक्यातील सरपंच ते त्याच तालुक्याचे सहावेळा आमदार असा विलक्षण प्रवास त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरवातीच्या काळापासून काम केले. अलीकडे ते राज्याच्या सक्रीय राजकारणापासून अलिप्त झाले होते. मात्र, त्यांची सून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून गेल्या सरकारच्या काळात कोपरगावचे प्रतिनिधीत्व केल्याने कोल्हे घराण्याचा भाजपशी संबंध आला.
कोल्हे यांचे सहकारातील योगदान मोठे आहे. १९६० मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या. शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ते सहा वेळा ते कोपरगावचे आमदार होते. या काळात महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. बी. एस्सी. अॅग्रिकल्चरची पदवी संपादन केलेले कोल्हे यांचे शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात मोठा कार्य आहे. येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. विविध विषयांवरील त्यांची पुस्तकेही आहेत. विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी त्यांनी परदेश दौरे केले.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे सासरे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आजोबा होते. येत्या 24 मार्चला शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस होता. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर आणि तालुक्यात शोककळा परसली आहे.