शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ मार्च ) :- देशनिष्ठा आणि देशभक्ती बद्दल भारतीय इतिहासातील सुवर्णपान म्हणजे शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे जीवन चरित्र होय असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज माछरे, संचालक उमेश बांदल, निलेश घुले, माजी संचालक योगेश रसाळ, अविनाश ढमाले आदी उपस्थित होते.
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेले समर्पण प्रत्येकासाठी प्रेरणा देणारे आहे. इंग्रजी राजवटी विरुद्धच्या संघर्षलढ्यात युवापिढीचे योगदान शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यामुळे अधोरेखीत झाले आहे. या शहिदांच्या आहुतीने युवापिढीमध्ये जोमाने स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी चेतना निर्माण झाली. देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांनी चेतवलेली देशभक्तीची ज्योत आजही युवकांच्या मनात तेवत आहे. देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी शहिदांचा अजरामर इतिहास सतत प्रेरणा देत राहील, असेही आयुक्त पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, दापोडी चौक येथील शहीद भगतसिंग आणि नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, विद्युत निरीक्षक विजयकुमार उईके, सहाय्यक उद्यान निरीक्षक राजेश शिरसाठ, माजी नगरसदस्य राजू बनसोडे, संजय काटे, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव रसाळ, तानाजी काटे, धनाजी गावडे आदी उपस्थित होते.