‘टेकमंथन २०२२’ मध्ये तळेगावच्या एनएमआयईटी आणि विविध आस्थापनांमध्ये सामंजस्य कराराची पुर्तता
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ एप्रिल) :- विविध टप्यांवर सुरु असणा-या संशोधनाव्दारे तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत आहे. अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कालावधी, कार्यानुभव आणि विविध आस्थापना, कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष कामाची पध्दत यामध्ये बराच फरक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये तसेच औदयोगिक आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव मिळावा. यासाठी ‘टेकमंथन २०२२’ या उपक्रमातून झालेले सांमजस्य करार विद्यार्थ्यांना तसेच आस्थापनांना उपयोगी ठरतील असे प्रतिपादन इन्फिनिटी टेक्नॉलॉजिचे आनंद स्वामी यांनी केले.
तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या (एनएमव्हीपी) आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी) मधील ई अँड टिसी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘टेकमंथन २०२२’ कार्यक्रमात स्वामी बोलत होते. यावेळी एनएमव्हीपीचे सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, विश्वस्त सोनबा गोपाळे, संस्थेच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण विभाग अधिष्ठाता डॉ. जान्हवी इनामदार, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, एनसीईआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, सीटीओ आयईईई पुणे विभागाचे अध्यक्ष डॉ. गिरीश खिलारी, प्रशिया इंजिनिअर्स अँड ऑटोमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता कावडे, विभागप्रमुख डॉ. विलास देवतारे तसेच भोसरी, पुणे, चाकण, आंबी, उर्से या औदयोगिक क्षेत्रातील विविध चाळीस आस्थापनातील व्यवस्थापक, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विविध आस्थापनाच्या प्रतिनिधी व व्यवस्थापकांच्या समवेत योग्य समन्वय साधला जावा आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, संशोधन, इनक्युबेशन सेंटर, औद्योगिक कारखान्यांना भेटी, उद्योजकांच्या तसेच वरिष्ठ अधिका-यांच्या प्रत्यक्ष मुलाखती यातून नोकरी व व्यवसायाच्या संधी यासाठी सामंजस्य करार करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना फक्त पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता तांत्रिक कौशल्य देखील आत्मसात करून स्वतःचा विकास करावा या उद्देशाने आयोजित केलेल्या टेकमंथन २०२२ या कार्यक्रमातून पुढील काळात येथील औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळ मिळेल असा आशावाद सीटीओ आयईईई पुणे विभागाचे अध्यक्ष डॉ. गिरीश खिलारी यांनी व्यक्त केला.
अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम आणि उद्योग जगतातील विकसीत तंत्रज्ञान यातील अंतर हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच कमी करून प्रत्यक्ष औदयोगिक आस्थापनांसोबत काम करून अनुभव संपन्न व्हावे असे प्रशिया इंजिनिअर्स अँड ऑटोमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता कावडे म्हणाले. डॉ. विलास देवतारे आणि प्रा. किरण जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
स्वागत प्राचार्य डॉ. ललित कुमार वाधवा, सूत्रसंचालन डॉ. गायत्री अंबाडकर, आभार प्रा. किरण जाधव यांनी मानले.