शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ एप्रिल) :- “पुस्तक हे समाजाचे मस्तक असते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे स्वतंत्र वास्तू बांधून त्यामध्ये सुमारे पन्नास हजार ग्रंथांचा संग्रह केला होता. पुस्तकं हीच आपली खरी संपत्ती अन् मित्र आहेत, असे ते मानत असत!” असे प्रतिपादन आकुर्डी येथील म्हाळसाकांत महाविद्यालयातील प्राध्यापक धनंजय वाघमारे यांनी खिंवसरा-पाटील विद्यालय, थेरगाव येथे गुरुवार, दिनांक १४ एप्रिल रोजी महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले. आदर्श ग्रामसेवक सुभाष डोळस हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय शाळा समिती अध्यक्ष नितीन बारणे, खिंवसरा-पाटील विद्यामंदिर मुख्याध्यापक, संकुल पालकप्रमुख नटराज जगताप, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बालवाडी विभागप्रमुख आशा हुले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्रिशरण पंचशीलाचे सामुदायिक पठण केल्यानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुनीता सलगर यांनी प्रास्ताविक केले. हर्षल हंकारे या विद्यार्थ्याने बाबासाहेब आंबेडकर यांचा पाळणा सादर केला. श्रेयस बाकले, आदित्य क्षीरसागर, नम्रता ओव्हाळ, श्वेता दाभाडे, विश्वजित कोळसे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला.
प्रमुख वक्ते प्रा. धनंजय वाघमारे पुढे म्हणाले की, “विद्यार्थिदशेत आठ वर्षांचा अभ्यासक्रम फक्त दोन वर्षांत पूर्ण करणारे बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले विद्यार्थी होते. त्यांनी एकूण बत्तीस पदव्यांचे संपादन केले होते. त्यापैकी अकरा प्रत्यक्ष शिक्षणाशी संबंधित होत्या; तर उर्वरित पदव्या त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्या होत्या. त्यांना सुमारे अकरा भाषा अवगत होत्या. इंग्रजी ही जागतिक पातळीवरील भाषा असल्याने बाबासाहेबांनी आपले सर्व लेखन इंग्रजीमधून केले. आपले विचार केवळ भारतीयच नव्हे तर जगातील सगळ्या दीनदुबळ्यांपर्यंत पोहोचावे हा त्यामागचा उद्देश होता. जगातील सर्व धर्मांचा अभ्यास करणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव व्यक्ती होती. जगातील विद्वान व्यक्तींच्या यादीत बाबासाहेब दुसऱ्या क्रमांकावर आहेत. १९४१ साली त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!’ हा संदेश दिला. त्यांच्या या संदेशापासून फक्त विद्यार्थीच नव्हे तर संपूर्ण समाजाने प्रेरणा घेतली!”
सुभाष डोळस यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून गोष्टीरूप प्रबोधन केले. कार्यक्रमानंतर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत परिवर्तन सोशल फाउंडेशन आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
खिंवसरा-पाटील शैक्षणिक संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. सीमा आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. खिंवसरा-पाटील विद्यालय शाळा समिती अध्यक्ष डॉ. नीता मोहिते यांनी आभार मानले.