वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.२० एप्रिल) :- गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रसह इतर पाच राज्यांना खबरदारी घेण्यासंदर्भात पत्र पाठवले आहेत.राज्यातलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं असतानाच गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे काहीशी शंका उपस्थित केली जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत मोठं विधान केले आहे.
एकाच दिवशी १३५ रुग्ण! गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात ५९ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक म्हणजेच १३७ नवे करोनाबाधित वाढले आहेत. देशभरात २४ तासांत १२४७ रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. ही चौथी लाट असल्याची देखील भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर सविस्तर भूमिका मांडली आहे.
I've held a detailed review of COVID19 situation in the state. There is no need to worry as there has not been a significant rise in cases. The situation is completely under control. We are vaccinating those in the 12-15 & 15-18 age groups: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/180nwiRVgV
— ANI (@ANI) April 20, 2022
घाबरण्याचं कारण नाही!
एकाच दिवसात दुपटीहून जास्त रुग्ण वाढले असले, तरी घाबरण्याचं कारण नसल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. “केंद्रानं दिलेल्या पत्रात काही राज्यांचा उल्लेख केला आहे. काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण १३५ केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८५ केसेस आहेत. महाराष्ट्राने ६० हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे. कुठेही घाबरण्याचं कारण नाहीये. लसीकरणाचं प्रमाण देखील चांगलं झालं आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.
लसीकरणाचं आवाहन
दरम्यान, राजेश टोपेंनी सर्वांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा देखील सल्ला त्यांनी दिला आहे. “१२ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला देखील आम्ही प्रोत्साहन देतोय. त्यासाठी जनजागृती करतो आहोत. लसीकरण स्वत:च्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. बूस्टर डोससंदर्भात केंद्र सरकारने तसे निर्देश दिले आहेत. लोकांनी खासगी केंद्रात शुल्क देऊन बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही. पण आज काळजीचा विषय नाही. आपण निर्बंध मुक्त केले आहेत. मास्कसक्ती हटवली आहे. पण ज्येष्ठ नागरिक किंवा सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीत मास्क घालण्याची काळजी घ्यावी”, असं ते म्हणाले.