मुख्यमंत्री राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा
वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.२७ एप्रिल) :- राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. पण गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार आहे. याबाबत मुख्यमंत्री आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोना स्थिती नेमकी कशी आहे याची माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मास्कसक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मास्कसक्ती करावी की नाही. यावर चर्चा झाली आहे. राज्यात दररोज २५ हजारांपर्यंत चाचण्या करत आहोत. लसीकरण वाढवले जात आहे. जीनोम सिक्वेसिंग करायला सांगितले जात आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्र सेफ झोनमध्ये आहे. राज्यात प्रति १० लाखांमध्ये ७ केसेस आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.
६ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण
६ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण आता होणार आहे. पण याबाबत केंद्राकडून सविस्तर नियम आलेले नाही. पण त्याची राज्यात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करु, असेही ते म्हणाले. तसेच १२ ते १५ आणि १५ ते १७ वयोगटातील लसीकरण कमी असून ते जाणीवपूर्वक लक्ष ठेवून वाढवावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोरोनास्थितीसंबंधी चर्चा केली. गेल्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोनासंबंधी केलेल्या एकत्रित कामगिरीबद्दल बैठकीतून पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.