शबनम न्युज | पुणे
मशीदींवरील भोंगे उतरले नाहीत, तर त्यासमोर दुप्पट आवाजात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं होतं. यावरून राजकारण तापलेलं असतानाच आता राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. आज राज ठाकरेंची पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे जाहीर सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर चौफेर निशाणा साधला.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे कारण सांगितले. ते म्हणाले कि, “ज्या प्रकारचा माहौल अयोध्येत उभा केला जात होता…मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. म्हटलं मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देखील केसेस टाकल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी इथे कुणीच नसतं. हा सगळा सापळा होता”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.