शबनम न्युज | पुणे
गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेनं पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी अट घातल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला नकार दिला. शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी आज राज्यसभा निवडणूक लढविणार की नाही यावर पडदा टाकला. मी राज्यभर दौरा करणार असून माझी ताकद मला पहायची आहे. स्वराज्य संघटना उभी करायची आहे. ४२ आमदार माझी ताकद नाही, तर जनता ही आहे, असे संभाजीराजांनी स्पष्ट केले.
घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही.याचबरोबर ही माघार नाही, मी माझा स्वाभिमान जपला. मला कोणच्याही बंधनात अडकायचे नव्हते. अनेक आमदारांनी मला फोन केला होता, निवडणूक लढविण्यास ते सांगत होते. प्रत्येक पक्षाचा अजेंडा असतो, त्यानुसार त्यांना काम करायचे असते. त्याचा मला आदर आहे, ही लोकशाही आहे, असेही ते म्हणाले.