शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून दरवर्षी काढला जातोय गाळ
शबनम न्युज | पिंपरी
मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने पवना धरणातून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मागील 15 दिवसात धरणातून तब्बल 15 हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. मागील सातवर्षांपेक्षा यंदा सर्वाधिक गाळ काढण्यात आला असून गाळ काढण्याचे काम अद्यापही सुरु आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. धरणातील गाळ शेतक-यांना शेतात टाकण्यासाठी उपयोगी पडत आहे. त्यामुळे शेतक-यांचाही फायदा होत असल्याचे ते म्हणाले.
पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) पाहणी केली. शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, उपतालुकाप्रमुख अमित कुंभार, मदन शेडगे, ठाकुरसाईचे सरपंच नारायण बोडके, पोलीस पाटील अनंत खैरे, शिवसेना विभागप्रमुख उमेश दहिभाते, शक्तील जव्हेरी, किशोर शिर्के, विलास कालेकर, अतुल केंडे, अनिल भालेराव, सुरेश गुप्ता, खंडु कालेकर, तानाजी लायगुडे, दत्ता भेगडे, अमोल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागाचा पाणी पुरवठ्याचे पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले. परंतु, धरणातील साठवण क्षमता वाढविण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. त्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून धरणातील पाण्याची क्षमता वाढण्यासाठी मागील सात वर्षांपासून गाळ काढला जातो. आत्तापर्यंत 54 हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. त्यामुळे धरणातील साठवण क्षमतेत वाढ झाली. गाळ काढल्यामुळे पाणीसाठा अधिकचा राहत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांवरील पाणीसंकट टळले. धरणातून काढलेला गाळ शेतक-यांना दिला जातो. पवना धरण परिसरात नर्सरी, फळबागांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी गाळाचा उपयोग केला जातो. त्यामुळे शेतक-यांना देखील फायदा होतो.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पवना धरणातील गाळ काढण्याचे काम मागील सात वर्षांपासून चालू आहे. पिंपरी-चिंचवड शहर, तळेगावदाभाडे, एमआयडीसीच्या क्षेत्राला धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात या धरणात आजुबाजूच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात गाळ येतो. त्यामुळे पाणी साठण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यापार्श्वभूमीवर सात वर्षांपासून धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. दरवर्षी गाळ काढला जातो. कोरोनामुळे एक वर्ष गाळ काढला नाही. यंदा पुन्हा परवानगी घेऊन गाळ काढण्याचे काम सुरु आहे. धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेची मदत न घेता सामाजिक संस्था, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मदतीने गाळ काढला जात आहे. मागील सात वर्षात धरणातून 54 हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. धरणातील गाळ शेतक-यांना फळबागा, नर्सरीला उपयोगी पडतो. त्यामुळे शेतक-यांचाही फायदा होतो”.
बाधित शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा
”धरणातील पाणीसाठा वाढल्याने पिंपरी महापालिकेला शहरवासीयांसाठी पाण्याचा वापर करता येतो. पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षापूर्वी पाण्याची समस्या मोठी होती. धरणातील पाणीसाठा वाढल्याने शहरवासीयांना पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत नाही. धरण परिसरातील शेतक-यांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. धरणासाठी जमिनी गेलेल्या बाधित शेतक-यांना न्याय मिळवा यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्याने शेतक-यांनाही मोठा फायदा होत आहे. उन्हाळ्यातही शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी, मावळचे तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे”, असेही खासदार बारणे म्हणाले.
यंदा धरणाच्या चारही बाजुंनी काढला जातोय गाळ!
यंदा तीव्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. परिणामी, पवना धरणातील पाणीसाठा वेगात कमी झाला. त्यामुळे यंदा धरणातील गाळ काढण्यास मोठी संधी आहे. त्यादृष्टीने परवानगी घेऊन 15 मे पासून गाळ काढण्यास सुरूवात केली. पवना धरणाच्या चारही बाजुंनी गाळ काढला जातोय. आजपर्यंत 15 हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. गाळ काढण्यास आणखी आठ ते दहा दिवस मिळू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ काढला जाईल. गाळ काढल्याने धरणाची खोली वाढत आहे. परिणामी, पाणी साठण्यास मोठी मदत होणार आहे. गाळ घेऊन जाणा-या चालकांनी डंपरच्या क्षमतेपेक्षा जास्त गाळ भरुन वाहतूक करु नये. गावक-यांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी गाळ घेऊन जाणा-यांना केल्या.