शबनम न्युज | पिंपरी
“भारतीय वैज्ञानिक हेदेखील स्वातंत्र्ययोद्धे आहेत!” असे प्रतिपादन ज्येष्ठ कार्पोरेट ट्रेनर सतीश सगदेव यांनी संजय काळे क्रीडांगण, आकुर्डी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक ३० मे २०२२ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘भारतीय स्वातंत्र्यलढा आणि विज्ञान’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना सतीश सगदेव बोलत होते. ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष चांदबी सय्यद यांनी प्रास्ताविकातून प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली; तर मधुश्री कला आविष्कारचे कार्याध्यक्ष सलीम शिकलगार यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनातील समस्यांवर मात करून प्रबोधनाचा जागर अखंडित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. राजेंद्र घावटे यांनी आपल्या मनोगतातून, “पूर्वेकडचे अध्यात्म पश्चिमेकडे गेले अन् पश्चिमेचे विज्ञान भारतात आले. पारतंत्र्याच्या काळात समाजात विज्ञानविषयक जागरुकता नसली तरी प्राचीन भारतीय संस्कृतीत विज्ञान रुजले होते!” असे विचार मांडले.
रमेश वाकनीस आणि चंद्रशेखर जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सतीश सगदेव पुढे म्हणाले की, “भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा संघर्षाचा, अतुलनीय त्यागाचा आणि शौर्याचा आहे. सन १७६० मध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे ब्रिटिशांची वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली अन् जगावर राज्य करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. नेमका त्या काळात भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव होता. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतात चंचूप्रवेश केला. वैज्ञानिक सुविधांच्या अभावी भारत १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम हरला. भारतातील अफाट साधनसंपत्ती पाहून ब्रिटिशांनी सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. या अफाट प्रकल्पासाठी त्यांनी भारतीयांना कनिष्ठ पदांवर सामावून घेतले. प्रचंड जंगलतोड करून नीळ, ऊस, चहा यांची लागवड केली. साधनसंपत्तीची सुलभपणे लूटमार करता यावी म्हणून रेल्वे, पोस्ट अँड टेलिग्राम या सुविधा निर्माण केल्या. दुर्दैवाने मूठभर उच्चशिक्षित भारतीयांच्या मनांत त्यामुळे ब्रिटिशांविषयी कृतज्ञता निर्माण झाली. महेंद्रलाल सरकार यांना ब्रिटिशांच्या कुटनीतीचा प्रत्यय आल्यावर त्यांनी कलकत्ता मेडिकल जर्नल्सच्या माध्यमातून विज्ञान प्रसाराला प्रारंभ केला. इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेतून डॉ. आघारकर, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण घेतले. जगदीशचंद्र बसू यांनी सूक्ष्म तरंगांचा शोध लावला; मात्र त्याचे श्रेय मार्कोनी यांनी लाटले.
प्रफुल्लचंद्र रॉय यांनी रसायनशास्त्राचा पाया घातला. प्रमथनाथ बसू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला. १९०५ साली स्वदेशीची चळवळ सुरू झाली; तर १९०८ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही जमशेटजी टाटा यांच्या साहाय्याने महत्त्वाची संस्था स्थापन करण्यात आली. त्यामुळे मेघनाद सहा, सत्येंद्र बसू असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक वैज्ञानिक निर्माण झाले. ज्या विज्ञानाच्या साहाय्याने ब्रिटिशांनी भारतावर वर्चस्व प्रस्थापित केले; त्याच विज्ञानाचा आधार घेऊन भारतीय वैज्ञानिकांनी त्यांच्या वर्चस्वाला हादरा दिला. त्यामुळे भारतीय वैज्ञानिक हेदेखील स्वातंत्र्ययोद्धे आहेत!” विनायक गुहे, अश्विनी कुलकर्णी, शरद काणेकर, वर्षा बालगोपाल यांनी संयोजनात सहकार्य केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.