शबनम न्युज | पुणे
‘सूर्योपासना:संपूर्ण आरोग्याची नांदी’ या निखिल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये शनीवारी सायंकाळी ६ वाजता झाले.
विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी ) मराठी विभागातर्फे प्रकाशित या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामजन्मभूमी न्यासाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे
उपस्थित होते.
विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट, विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, मधुवंती पेठे हे मान्यवर उपस्थित होते. सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले.
गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, ‘देह हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे. व्यक्तिमत्व विकासाचा भारतीय ऋषींनी जेवढा विचार केला, तेवढा जगात कोणी केला नाही.योगाचा अभ्यास पुढील पिढया करतील तेव्हा तो उलगडत जाईल. आत्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. सूर्यनमस्कार हे त्यासाठी साधन आहे. वैदिक पणाने जगणारा व्यक्ती शंभर वर्ष जगू शकतो. सूर्यनमस्कारात आसन, व्यायाम, प्राणायाम, उपासना आहे. असे हे एकमेव साधन आहे.कल्पवृक्ष आहे. मानवाचा पंचकोषाला त्याचा उपयोग आहे. ही परंपरा पुढे चालवली पाहिजे.
खा. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘सूर्योपासना पुस्तकातून सर्वंकषता समोर येते. सूर्यनमस्कार ही कृतज्ञता व्यक्त करणारा संस्कार आहे. पारंपारिक गोष्टींचे जीवनशैलीशी सांगड घालणे महत्वाचे आहे. अशा गोष्टींचा शोध घेत राहिले पाहिजे.आपले पारंपारिक ज्ञान वैभव विसरून चालणार नाही.आपल्या सांस्कृतिक वारशापासून आपणच वंचित राहत आहोत. हा ठेवा पुढील पिढयांकडे सोपवला पाहिजे. सूर्यनमस्कार हा समर्थ भारताच्या निर्मितीसाठी महत्वाचे साधन आहे.
निखिल कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूर्यनमस्कार हा सकारात्मकतेचा प्रवास आहे, असे त्यांनी सांगीतले.आपली ओळख काहीही असली तरी आपण सर्वप्रथम सूर्यपूत्र आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. वसुधा करंदीकर यांनी आभार मानले.
सूर्यनमस्कारांची चिकित्सा करणारे लेखन
निखिल कुलकर्णी हे सूर्यनमस्कार अलायन्स या संस्थेतर्फे कॅलिफोर्नियाच्या बे एरियात गेली दोन-अडीच दशके सूर्यनमस्काराचा प्रचार-प्रसार करतात.
लॉकडाऊनच्या काळात सूर्यनमस्कारांची योगिक-शारीरिक-वैद्यकीय चिकित्सा करणारे काही लेख निखिल कुलकर्णी यांनी सोशल मिडियावर लिहिले होते. त्या व आणखी काही नव्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे.