शबनम न्युज | पिंपरी
एच.आय.व्ही. संसर्गित मुलांना मायेची ऊब देऊन त्यांचे संगोपन, जेवण, कपडे, आरोग्य, शिक्षण देत त्यांना नोकरी व विवाह यांमध्ये गेली २५ वर्षे मदतकरणारी ‘मानव्य’ संस्था यंदा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन शनिवार दि. १८ जून २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुण्याच्या मयूर कॉलनी – कोथरूडमधील बालशिक्षण मंदिर ऑडीटोरियममध्ये साजरा करणार आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. याप्रसंगी भारतीय स्त्री शक्तीच्या उपाध्यक्षा डॉ.नयना सहस्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतो अशी माहिती मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात ‘मानव्यच्या पाऊलखुणा’ ह्या स्मरणिकेचे प्रकाशन व संस्थेसाठी विशेष योगदान देणाऱ्यांचे सत्कार करण्यात येणार असून संस्थेच्याविश्वस्तश्रीमती विनया देसाई कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील असे शिरीष लवाटे यांनी सांगितले. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.
या निमित्त मानव्याच्या भूगाव येथील गोकुळ प्रकल्पामध्ये संस्थापिका विजयाताई लवाटे यांच्या अर्धपुतळ्याचे “अनावरण समारंभ” भूगावच्या सरपंच वनिता ताई तांगडे यांच्या हस्ते व ग्रामपंचायत सदस्य विशाल आप्पा भिलारे, वैशाली ताई सणस आणि मुळशी जिल्ह्याचे वरिष्ठ नेते शांताराम दादा इंगवले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सन १९९७मध्ये कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांनी एच.आय.व्ही. सांसर्गिक मुलांसाठी “मानव्य” या संस्थेची स्थापना केली. गेले २४वर्षे ही संस्था अविरत काम करत असून आता भूगाव येथील मानव्य गोकुळ प्रकल्पाच्या वसतिगृहात ५० मुले-मुलींना राहण्याची सोय आहे. त्यांचे औषधपाणी, जेवणखाण, राहणे तसेच शिक्षण देऊन पायावर उभे करण्यापर्यंतचा सर्व खर्च संस्था विविध देणगीदारांच्या मदतीने करते. समाजात परत पाठविल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काचे कुटुंब मिळावे यासाठी २०१० सालापासून एच.आय.व्ही व्यक्तींसाठी वधू वर मेळावा संस्थेतर्फे आयोजित केला जातो. आता पर्यंत संस्थेतील १० ते १२ जणांची लग्न संस्थेने करून दिली आहेत आणि त्यांना त्यांचे कुटुंब मिळवून दिले आहे. अतिशय समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे योग्य वेळी देलेल्या औषधोपचारामुळे यांची होणारी संतती ही एच.आय.व्ही संसर्गित होत नाही असे शिरीष लवाटे यांनी सांगितले.