शबनम न्युज | मुंबई
राज्यात शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असून ४० हून जास्त आमदारांनी बंडखोरी केली आहे. बंडखोर गटाचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत असून शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या दाव्याला उत्तर देत, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी रस्त्यावर उतरली तीच खरी शिवसेना असे संजय राऊत म्हणाले. त्यासोबतच, माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे पण तरीही शेवटच्या श्वासापर्यंत मी ठाकरे परिवारासोबतच राहीन असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
ईडीच्या भीतीने किंवा अन्य काही आमिषांना बळी पडून काही आमदार पळाले असतील तर ते योग्य नाही. जे स्वत:ला बछडे, वाघ म्हणून घेत होते, ते म्हणजे पक्ष नाही. काल जो रस्त्यावर पाहिला तो खरा शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अद्यापही मजबूत आहे. काही आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असं होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार यांनी प्रतिक्रिया दिली.