शबनम न्युज | मुंबई
मला बहुमताचा खेळ खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी मोठं केले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवल्याने पुण्य मिळत असेल ते त्यांना मिळू द्या. हा आनंद कुणीही हिरावून घेऊ नये. मला मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा अजिबात नव्हती. मला खुर्चीला चिटकून बसायचं नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय, त्याचसोबत विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतोय अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून केली.
आज न्यायदेवतेनं निकाल दिलाय. तो मान्य असायलाच पाहिजे. उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा जो आदेश दिला आहे, त्याचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. लोकशाहीचा मान राखल्याबद्दल धन्यवाद देतो. काही जणांनी पत्र दिल्यावर लगेच आदेश दिले. विधान परिषदेच्या सदस्याची यादी मंजूर केली तर आदर वाढेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक शिवसैनिक भेटले, गरीब, वयोवृद्ध ज्यांना काही दिले नाही ते खंबीर साथ देतायेत याला माणुसकी म्हणतात. सुप्रीम कोर्टाने आज बहुमत चाचणी देण्याचा निर्णय दिला. लोकशाहीचं पालन झालेच पाहिजे. दीड पावणे दोन वर्ष विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी तातडीने मंजूर केली तर राज्यपालांबद्दल आदर आणखी वाढेल. जे दगा देतील असं सांगत होते ते सोबत होते. काँग्रेस बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे. आपली नाराजी सूरत, गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा वर्षा किंवा मातोश्री या हक्काच्या घरात येऊन सांगायचं होतं. तुमची नाराजी नेमकी काय आहे हे एकदा समोर बोलावं आजही मी हे बोलतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच आज शिवसैनिकांना नोटीस पाठवली जाते. केंद्रीय सुरक्षा पथक मुंबईत दाखल होतेय. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यांच्या रक्ताने तुम्ही मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? उद्या कुणीही बंडखोर आमदारांचा रस्ता अडवू नका. नव्या लोकशाहीचा जन्म जल्लोषात झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही आडवं येणार नाही. घ्या शपथ, बहुमत चाचणी फक्त डोकी मोजली जाणार आहे. कुणाकडे किती संख्या आहे ते बघणार यात मला रस नाही. माझ्याविरोधात एकही माझा माणूस राहिला तर माझ्यासाठी ते लज्जास्पद आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.