शबनम न्युज | मुंबई
नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या असून, बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. यावेळी दाबोळी विमानतळावर बोलताना, बहुमत चाचणी सहजपणे पार करू शकेन, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोव्याला रवाना झाले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची बैठक घेतली. यानंतर ते आता पुन्हा मुंबईत आले आहेत. मुंबईला रवाना होत असताना दाबोळी विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, माझ्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. हे निश्चित आहे की, बहुमत चाचणी सहजपणे पार करून शकेन, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी तीन आणि चार जुलै रोजी अधिवेशन बोलवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच पुढे बोलताना त्यांनी आम्हाला बहुमताची चिंता नाहीय, आमच्याकडे १७० आमदार आहेत असा दावा केलाय. यावेळेस पत्रकारांनी शिंदेंना बंडखोर आमदार महाराष्ट्रात कधी परत येणार?, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना शिंदे यांनी, “सर्व आमदार उद्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत,” असं उत्तर दिलं. “तीन आणि चार तारखेला अधिवेशन बोलवलं असून तेव्हा सर्व काही प्रक्रिया पार पडेल. आमच्याकडे १७० आमदार असल्याने बहुमताचा प्रश्नच येत नाही,” असंही यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.