शबनम न्युज | मुंबई
काल भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यांनतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र ट्विट केले आहे. या पत्रकात राज ठाकरेंनी फडणवीसांचे अभिनंदन केलं आहे. तसेच या पत्रकात ठाकरेंनी फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक केलंय.
पत्रात ते म्हणाले कि, “सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…” असं म्हणत राज यांनी पत्राची सुरुवात केली आहे.
“तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपम-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत.”“पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन!,”
‘आता जरा आपल्यासाठी’ असं म्हणत पत्राच्या मध्यापासून राज यांनी एका रुपकामधून फडणवीसांचा हा निर्णय माघार नसल्याचं म्हटलंय. “ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे,” असं राज म्हणालेत.
पत्राच्या शेवटी राज यांनी, “एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!” असं म्हणत फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात.
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/2TokAB3E1F
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2022