शबनम न्युज | मुंबई
आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज विश्वासदर्शक ठराव विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले यात शिंदे-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तसेच आजच्या अधिवेशनात अभिंनदन प्रस्तावात बोलताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, या सभागृहाने शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास केला त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी याच्या बाजूने मतदान केले त्यांचे आभार मानतो. पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते म्हणाले कि, आजही एकनाथ शिंदे ४०० ते ५०० लोकांना भेटतात. मी एकनाथ शिंदेंना सांगितले की मुख्यमंत्र्यानी थोडी वेळ पाळली पाहिजे. मला असं वाटत आहे की याची त्यांनी सुरुवात केली आहे. येत्या काळामध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ते काम करतील याचा मला विश्वास आहे.
ते पुढे म्हणले कि, २००४ पासून सलग चार वेळा एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मागच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्याहून महत्वाचं म्हणजे त्या काळात सीमाप्रश्नावर जे काही आंदोलन झालं त्या आक्रमक आंदोलनात एक नेता म्हणून दबदबा निर्माण केला. ४० दिवस बेल्लारीच्या तुरुंगात सीमाप्रश्नासंदर्भात कारावास भोगला आणि त्यातून एक मोठं व्यक्तीमत्व तयार झाले. १९९७ साली ठाण्यात नगसेवक, मनपा सभागृह नेते, आमदार, जिल्हाप्रमुख झाले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकार हे संवेदनशील असले पाहिजे. कुणी आंदोलन करत आहे म्हणून ते आपले विरोधक आहेत, असे मानणे योग्य नाही. आंदोलक कधी आक्रमक झाले तर कारवाई करावी लागते. पण आमच्याविरुद्ध एक शब्द बोललात, एक पोस्ट लिहीली तर आम्ही ऐकून घेणार नाही. आमच्याविरोधात बोललात तर जेलमध्ये टाकू ही अवस्था काही काळ आपल्याला पाहायला मिळाली. पण लोकशाहीमध्ये दुसरा आवाज आहे तो ऐकून घेतला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि, “आमचे आमदार उभे राहिले तेव्हा विरोधीपक्षातून काहींनी ईडी, ईडी म्हणून आरडा ओरडा केला. पण मी त्यांना सांगू इच्छितो. होय हे ईडीचं सरकार आहे. ही ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र” असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.