शबनम न्युज | पुणे
कोरोनामुळे दोन वर्षात आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले आहे. विद्यार्थ्यांची वर्गात जाऊन शिकण्याची, हाताने अक्षरे वळवण्याची सवय मोडली. शिक्षण बटणावर सुरू झाले. असे असले तरी विद्यार्थांनी शालेय अभ्यासाबरोबरच मन स्थिर करण्यासाठी वहीच्या शेवटच्या पानावर दिवसभरात कधीही अवांतर चार ओळी स्वत:चा अभ्यास म्हणून लिहिण्याची सवय लावून घ्यावी. रोजच्या अशा अवांतर लिहिण्याने मन स्थित होऊन धांधरटपणा कमी होतो, असे ज्येष्ठ लेखक व अभिनेते सतीश आळेकर यांनी आज येथे सांगितले.
स्वानंद ऍडव्हेंचर्स, संवाद पुणे आणि रंगभूमी सेवा संघटनेच्यावतीने पडद्यामागील कलाकारांच्या ५० मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप आज करण्यात आले. त्यावेळी सतीश आळेकर बोलत होते. विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला स्वानंद ऍडव्हेंचर्सचे अध्यक्ष संजीव शहा, त्यांच्या पत्नी साधना शहा, बालसाहित्यिक राजीव तांबे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, रंगभूमी सेवा संघटनेचे राहुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
करोना काळात सर्वच परिस्थिती विस्कळीत झालेली असली तरी, माणसाचा जीवनाकडे बघण्याची ओढ, सुसंस्कृतपणा कमी झालेले नाही हे आजच्या पदड्यामागिल कलाकारांच्या मुलांना केलेल्या शालेय साहित्य वाटपातून अधोरेखीत झाले आहे, असे आळेकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ऑन लाईन शिकण्याने वर्गात शिकण्याची, हातावर विश्वास ठेवून चिमटीत पेन धरून कागदावर अक्षरे वळवण्याची सवय राहिलेली नाही. आता पुन्हा एकदा आपण शाळेत जाऊ लागलो आहोत. मुलांनी शालेय अभ्यासा बरोबरच रोज चार ओळी किंवा पुस्तकातील एक पान वहीत लिहिण्याची असे अवांतर लेखन करण्याची सवय लावून घ्यावी. या लेखनातून मनाला स्थिरता येते, धांधरटपणा कमी होतो आणि याचा उपयोग पुढे आवडीचे विषय लिहिण्यासाठी होतो. राजचे अवांतर लेखन हा आपला वैयक्तीक अभ्यास आहे असे मानून तो करा.
डॉ.विखे पाटील म्हणाले, सुरूवातीपासून वह्यापुस्तके मिळणारी आजची मुले नशिबवानच म्हटली पाहिजेत. आमच्या लहानपणी आम्ही शिकलो चिमणीच्या उजेडात अन् पाटी पेन्सिलच्या सहाय्यानेच. त्यात गावात शाळा असल्याने आठवड्यातून एकदा वर्गही शेणाने सारवायला लागायचा. कधी एक वही मिळली तर त्यात चार चार विषयांचा अभ्यास आम्ही केलेला आहे. आजच्या पिढीला असे काही करावे लागत नाही. त्यामुळे त्यांना मदतीला चांगली माणसे आहे. त्यामुळे मुलांनी शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असलात तरी शिक्षणासाठी परिस्थितीकडे बोट दाखवून नका कारण शिक्षणासारखे दुसरे अस्त्रशस्त्र नाही. वडील बोट चालवत असूनही, त्यांच्या परिस्थितीकडे बोट न दाखवता शिकत राहिल्यानेच डॉ. अब्दुल कलाम हे जागतिक शास्त्रज्ञ झाले असा दाखलाही त्यांनी दिला. जे काही कराल त्यातून आनंद घ्यायला शिका.
बालसाहित्यिक राजीव तांबे म्हणाले, हे मला काय शिकवणार असा भाव मनात ठेवू नका किंवा कोणाकडूनही शिकण्यासाठी लाजू नका. आज या वयात मी संगणकावर फोल्डर कसा बदलायचा हे मी तिसरीत शिकणा-या मुलाकडून शिकलो आहे याचे माझ्या मुलांना खूपच आश्चर्य वाटते. आपण आपल्या वहीतील शेवटचे पान आठवड्यात आपण काय शिकलो हे लिहिण्यासाठी ठेवा, ते लिहित जा त्यातूनच तुमची प्रगती होत जाते. यावेळी सचिन ईटकर, रंगभूमी सेवा संघटनेच्यावतीने राहुल भोसले, विद्यार्थ्यांच्यावतीने तेजस्वीनी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना सुनील महाजन यांनी सांगितले की, करोना काळात आपण रंगभूमी सेवा संघटनेच्यावतीने पदड्यामागच्या कलाकारांना जमेल तशी मदत केली. आता रंगमंदिर खुली झाली असली तर रंगमंचीय कार्यक्रम पूर्वीसारखे होण्यासाठी अजून काही महिने लागतील. आपण मेडिक्लेम पॉलिसी सर्वांची काढली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणजे आजचा आपल्याच मुलांना शालेय साहित्य वाटप होत आहे. यापुढेही असे उपक्रम सुरू रहातील. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल जोशी यांनी केले.