शबनम न्युज | मुंबई
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू असून आता रुपया ८० वर गेला आहे, बेरोजगारी व महागाईने कळस गाठलाय, जीडीपी वाढण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत केवळ राजकरण करायचे, विकासाकडे लक्ष द्यायचे नाही अशी मोदी सरकारची परिस्थिती झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ता महेश तपासे यांनी केला. तसेच आता रुपया शंभरवर जाईल का? देशाची परिस्थिती श्रीलंकेसारखी होईल का? देशातील बेरोजगारी-महागाई आटोक्यात येणार का? असे प्रश्न देशातील जनतेला पडले आहेत. परंतु या प्रश्नांचे उत्तर मोदी सरकारकडे नसून त्यांचा वेळ विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्यात जात असल्याची टीका महेश तपासे यांनी केली आहे.
लोकसभेत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षात सुमारे चार लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. देशात इतके अच्छे दिन असतील तर एवढ्या संख्येने लोक देश का सोडत आहेत, असा सवाल तपासे यांनी मोदी सरकारला केला. केंद्र सरकारची प्राथमिकता ही विकास, जातीय सलोखा, शिक्षण, रोजगार नसून केवळ राजकारण आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच मोदी सरकारने आत्मपरिक्षण करायला हवे असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला.