शबनम न्युज | नवी दिल्ली
राष्ट्रपती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती असून, पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या. एकूण तीन फेऱ्यांबाबत बोलायचे झाले तर एकूण ३२१९ मते पडली या मतांचे एकूण मूल्य ८,३८,८३९ असे होते. यापैकी द्रोपदी मुर्मू यांना २१०१ मते मूल्य ५,७७,७७७ मिळाली तर यशवंत सिन्हा यांना १०१८ मते मूल्य २,६२,०६२ मिळाली.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान घेण्यात आले. देशाचे नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. १८ जुलैच्या मतदानात संसदेत ७२८ जणांनी मतदान केले. त्यात ७१९ खासदार आणि ९ आमदारांचा समावेश होता.
राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर द्रौपदीमुळे यांचा विजय निश्चित मानला जात होता. मुर्मू यांना एनडीए मधील घटक पक्षांसह शिवसेना, बीजेडी आणि वाय एस आर काँग्रेसचा पाठिंबा मिळाला तर यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी आणि सपा यांचा पाठिंबा मिळाला. दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू जिंकल्या असून, त्या देशाच्या पहिला आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.
यांनतर द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाचा काळ अत्यंत यशस्वी ठरेल, असा मला विश्वास आहे, असं भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले. २४ जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद नवनिर्वाचित राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळासाठी डिनरचं आयोजन करणार आहेत. राष्ट्रपती भवनात रात्री सात वाजता डिनर होणार आहे.