शबनम न्युज | मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वीही सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढूनही महाराष्ट्राने संयम दाखवला. दुर्दैवाने राज्यपालांनी महाराष्ट्राच्या कष्टकरी, मुंबई ज्यांच्या जीवावर उभी राहिली त्या मराठी माणसाच्या प्रवृत्तीवर आणि संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त केली हा महाराष्ट्राचा मोठा अपमान आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आणि प्रगतीमध्ये मराठी माणसांचा हात नाही अशा अर्थाचे उद्गार काढणे राज्यपालांना शोभते का? असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला. राज्यपालांबाबत किती दिवस संयम बाळगून आपण मर्यादेत राहायचे? महाराष्ट्राचा एवढा अपमान कधीही झालेला नाही. महाराष्ट्र बघ्याची भूमिका घेत आहे. नवे सरकार आणि नवे मुख्यमंत्री या अपमानाला उत्तर कसे देणार व कसा जाब विचारणार हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?
“कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.” असे वादग्रस्त वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते.