या पुरस्कार वितरण सोहळयाच्या पूर्वार्धात “जाणता राजा” हे महानाट्य संक्षिप्त स्वरूपात सादर करण्यात आले. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या स्नेही गंगाताई पवार यांचादेखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमावेळी बाबासाहेबांच्यावर आधारित ‘शिवशाहीर’ या अनुबोधपटाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्याच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अनुबोधपटाच्या निर्मितीची जबाबदारी विनोद सातव यांच्यावर सोपवण्यात आली.
पुढील वर्षीपासून संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्तीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने 11 लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा पुनीत बालन यांच्यावतीने करण्यात आली.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर यांनी ‘आता ऐसे कुणी राहिले नाही, या सम हा’ असे बाबासाहेबांचे वर्णन केले. असा पुरस्कार मिळायला भाग्य लागते अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणात ते म्हणाले, ‘जगात एकही धर्म असा नाही की, ज्यात मूर्ती पूजा करीत नाहीत, फक्त भारतीय संस्कृतीत ते सांगितले जाते, बाकीच्यांना ते माहीतच नाही.’ भाषणावेळी त्यांनी भारतीय संस्कृती, इतर देशांच्या संस्कृती, बाबासाहेब, शिवचरित्र यांवर थोडक्यात आढावा घेतला.
या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एखादं मिशन जगायचं कसं हे जसे बाबासाहेबांनी शिकवलं, तसंच मूर्ती आणि मंदिर बघायचं कसं हे देगलूरकर यांनी शिकवलं. ज्या कार्यक्रमांचे वक्ते बाबासाहेब स्वतः असायचे त्या कार्यक्रमाचे तिकीट ते स्वतः रांगेत उभे राहून काढायचे, कारण की ते पैसे त्या संस्थेला मिळणार असायचे. यांच्यासारखी मंडळी असताना हा पुरस्कार वर्षानुवर्षे चालू राहील याची मला खात्री आहे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव अभिषेक जाधव यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर संस्थेच्या कार्याची, शिष्यवृत्तीची आणि पुरस्काराची थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता डॉ. प्रसन्न परांजपे यांनी आभार व्यक्त करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.