शबनम न्यूज | दिल्ली (वृत्तसंस्था)
अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. प्रल्हाद मोदी यांनी रेशन दुकानदारांच्या समस्यांसाठी हे आंदोलन केले.
प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीच्या परिवारातील सदस्यालाच आपल्या रास्त मागण्यांसाठी अशाप्रकारे रस्त्यावर उतरावे लागते, हे उदाहरणच फार बोलके आहे. रेशन वितरणासाठी पश्चिम बंगालचं मॉडेल राबविण्यात यावं, अशी प्रमुख मागणी प्रल्हाद मोदी यांचे शिष्टमंडळ करणार आहे. याचा अर्थ भाजपची ज्या राज्यांमध्ये सत्ता आहे, तिथले मॉडेल कुचकामी ठरतेय हे स्पष्ट आहे.
यावेळी देशातील वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया देताना प्रल्हाद मोदी म्हणाले की, “ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करणार आहे. ज्यामध्ये आमच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांची यादी देण्यात येणार आहे. वाढत्या महागाईमुळे दुकाने चालवण्यासाठी जादा खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत आमच्या मार्जिनमध्ये केवळ २० पैसे प्रति किलो वाढ करणं, ही क्रूर चेष्टा आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी आम्हाला दिलासा द्यावा आणि आमची आर्थिक दुर्दशा संपवावी.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या शासनकाळात देशातील प्रत्येक घटक अडचणीत सापडला आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक, कामगार, व्यापारी, सैनिक अशा प्रत्येक घटकाला पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांचा फटका बसलाय. खुद्द नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबीयांनाही ही झळ बसताना दिसत आहे.