शबनम न्यूज | मुंबई
महागाई, बेरोजगारी आणि डॉलर या तीन गोष्टींनी मोदी सरकारच्या कार्यकाळात उच्चांक गाठला असल्याने तरुणवर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे बेरोजगारी दूर करण्याबाबतची पंतप्रधान मोदींची आश्वासने खोटी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत उज्ज्वला योजना आणली. पण या योजनेतील ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी गेल्या पाच वर्षात एकदाही नव्याने सिलिंडर भरला नाही, तर ७.६७ कोटी लाभार्थ्यांनी पाच वर्षात केवळ एकदाच सिलिंडर भरला आहे. तसेच काल सीएनजी दरात ६ रुपयांनी तर पीएनजी दरात ४ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे, याकडे तपासे यांनी लक्ष वेधले.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन ३२ दिवस उलटून गेले आहेत. या सरकारचे संविधानिक अस्तित्व अजून सुप्रीम कोर्टात सिद्ध व्हायचे असताना या ३२ दिवसात साडेसातशे जीआर काढण्यात आले आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी २३ जीआर काढण्यात आले आहेत, असे तपासे म्हणाले. या सरकारला राज्यातील गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यायला वेळ नाही, तर दुसरीकडे राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी शिक्षणासाठी ८५ कोटींची आर्थिक मदत मिळावी म्हणून आदिवासी संशोधन केंद्राने निवेदन दिले असतानना या निवेदनाची फाईल धूळ खात पडली आहे. ही मोठी शोकांतिका आहे, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.