पूजा चव्हाणला खरोखरंच न्याय मिळवून द्यायचा असेल तर, तात्काळ पक्षाचा राजीनामा द्या – देसाई
शबनम न्युज | मुंबई
आज राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये संजय राठोड यांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी”, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत व्यक्त केली. यांनतर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावरून चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजप आणि चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी पुढाकार घेतला होता. आज त्याच संजय राठोड यांना भाजपने पहिल्या रांगेत बसवून मंत्रिमंडळात स्थान देणे हे अत्यंत दुर्दैवी. चित्रा वाघ यांचं एक ट्विट आलंय, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी चित्रा वाघ आणि भाजपला सुनावले आहे. तुम्ही म्हणताय लढेंगे और जितेंगे, पण पूजा चव्हाणला खरोखरंच न्याय मिळवून द्यायचा असेल तर, तात्काळ पक्षाचा राजीनामा द्या. कारण, ज्या पक्षात तुम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराला बोलावलं नाही. तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले, त्याच पक्षाने संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिलंय. त्यामुळे, अशा पक्षात कशाला राहता, राजीनामा द्या, तरच लोकं तुमच्या पाठिशी उभी राहतील, असेही देसाई यांनी म्हटलं आहे.