आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे महापालिकेने न बुजविल्यास , खड्ड्यामधे “ वृक्षारोपण “ करणार – नवनाथ ढवळे
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
बेस्ट सिटी…स्मार्ट सिटी.. अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांतील काही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. याचा प्रत्यय पुनावळे गावात येतो. कोयते वस्ती ते काटे वस्ती या रस्त्याची केवळ चाळण झालेली नाही, तर अक्षरश: रस्ता बुडाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमधून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे महापालिकेने न बुजविल्यास , खड्ड्यामधे “ वृक्षारोपण “ करणार असल्याचा इशारा नवनाथ ढवळे (उप अध्यक्ष – भा ज पा पिपंरी- चिंचवड शहर जिल्हा) यांनी प्रशासनाला दिला आहे.
पुनावळे गावठाणकडून जांभेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मुंबई- पुणे महामार्गालगतचा परिसर असल्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. पुनावळे गावठाणहून कायते वस्तीकडून काटेवस्तीकडे जाणाऱ्या रस्तयावर पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. पावसाळी पाणी निचरा व्यवस्था सक्षम नसल्यामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी येते. त्यातच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे काटेवस्तीकडील नागरिकांचा संपर्क तुटावा, अशी स्थिती आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुनावळे गावचा समाविष्ट होवून सुमारे २० वर्षे झाली. मात्र, गावठाण वगळता सभोवताच्या परिसरात अद्यापही पायाभूत सुविधांची वानवा आहे. ३३ मीटर रस्ता प्रस्तावित असताना ड्रेनेजलाईन किंवा स्ट्रॉम वॉटर लाईचेही काम नियोजनबद्ध झालेले नाही. गेल्या महिनाभरापासून रस्त्यावर सांडपाणी येत आहे. मात्र, प्रशासक असल्याचे कारणे देत डोळेझाक केलेली पहायला मिळत आहे.
नागरी आरोग्याचा प्रश्न…
स्वच्छ आणि सुंदर शहर अशी घोषणा महापालिका प्रशासनाकडून केली जात असली, तरी पुनावळेतील स्थिती प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. सुशिक्षीत लोकांच्या वास्तव्याचा परिसर म्हणून विकसित होणाऱ्या या भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळणारच नाहीत का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. सांडपाण्याचे तळे निर्माण झाल्यामुळे नागरी आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.