शबनम न्युज | पुणे
“केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यामुळे कामगारांची मुस्कटदाबी होणार असून “कायम कामगार” ही संकल्पना नष्ट होणार आहे.वास्तविक पाहता कामगार हा विकासाच्या मार्गातील एक महत्त्वाचा घटक असून श्रमाच्या प्रत्येक थेंबातून विकासाची गंगा वाहते आहे.अशा कामगारांच्या विरोधात कायदे करून शासन हेच विकासाच्या मार्गात अडथळे आणू पाहात आहे.हा विरोधाभास लक्षात घेऊन केंद्र सरकारचे हे कामगार विरोधी कायदे राज्य सरकारने लागू करू नयेत”.असे मत गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी पुणे येथे मांडले.
संबधित कामगार विरोधी आणि मालकधार्जिणे कायद्याच्या विरोधात अप्पर कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे प्राणांतिक उपोषणाला बसलेले राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे कामगार नेते यशवंतराव भोसले यांच्या आंदोलनाला मंडळाचा पाठिंबा जाहीर करताना त्या बोलत होत्या.
या प्रसंगी त्यांनी आपल्या मंडळाच्या माध्यमातून सर्व आंदोलनकर्त्यांचे व यशवंराव भोसले यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला व म्हणाल्या की,”भोसले यांचे हे प्राणांतिक उपोषण केवळ पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील कामगारांच्या हितासाठी मर्यादित नसून संपूर्ण भारतातील कामगारासाठी आहे,देशाच्या हितासाठी आहे.त्याकरिता जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त यांनी या आंदोलनाची इतंभूत माहिती शासनापर्यंत पोहोचवावी व केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी त्याची दाखल घेऊन कामगार विरोधी कायदे त्वरित रद्द करावेत.अन्यतः कामगारांचे हे आंदोलन अधिक तीव्र होईल”.
या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी आपल्या भाषणात राज्यातील सर्व कामगारानी आणि कामगार संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या वेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांच्यासोबत उपाध्यक्ष तानाजी एकोंडे,सचिव राजेश हजारे,खजिनदार भरत शिंदे,सहखजिनदार गोरखनाथ वाघमारे,प्रसिध्दी प्रमुख श्रीकांत (अण्णा) जोगदंड,पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे,सदस्य रवींद्र चव्हाण,पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष सतीश देशमुख आदी पदाधिकारी आणि अनेक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.