शबनम न्युज | पिंपरी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बीना एज्युकेशनल सोसायटी आणि हिंदी-उर्दू साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौमी एकता मुशायरा आणि कविसंमेलनातून जातीय सलोखा अन् सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे रविवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पूना कॉलेजमधील प्रा. डॉ. आफताब अन्वर, उद्योजक शौकत खान यांची प्रमुख उपस्थिती होती. बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक- अध्यक्ष इक्बाल खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हिंदी-उर्दू गझल मुशायरा आणि मराठी कविसंमेलनात डॉ. कमर सुरूर (अहमदनगर), हिसामुद्दीन शोला, अस्लम चिश्ती, दीपिका कटरे, कांचन पाडळकर (पुणे), अमिन झा राही, विनीत शंकर (बिहार), जिया बागपती, राज अहेरराव, जितेंद्र राय (पिंपरी-चिंचवड) या निमंत्रित कवींनी आपल्या हिंदी, उर्दू, मराठी गझला, भक्तिरचना, देशभक्तिपर कविता आणि शृंगारिक रचनांनी उपस्थितांची मने जिंकली. डॉ. कमर सुरूर यांनी,
“खुशी में गम में कही भी नजर नही आते
ये उंचे लोग कभी गरिबोंके घर नही आते”
या गझलेतून सामाजिक विषमता अधोरेखित केली; तर अस्लम चिश्ती यांनी,
“ये दो दिलोंको मिलाने का पैगाम देती हैं
इसलिए तो ये उर्दू जबान बाकी हैं’
या शेरातून उर्दूची महती कथन केली. हिसामुद्दीन शोला यांनी आपल्या हझल (विनोदी रचना) मधून,
“ए खुदा मौत मेरी आये तो प्यारी आये
मेरे मरते ही मेरे यार की बारी आये”
असे मानवी स्वभावाचे अचूक व्यंगदर्शन करीत हशा पिकवला. जिया बागपती यांनी,
“मैं खुद को बेच दू बच्चों के खातीर
अगर भाव मेरा अच्छा निकल आये”
या शब्दांत परिस्थितीने हतबल झालेल्या पित्याची व्यथा मांडताना रसिकांना अंतर्मुख केले. बिहारमधून आलेल्या विनीत शंकर या तरुणाने,
“उसने मेरे आगे जाने क्या क्या रखा
मैंने उसके आगे बस्स खुद्दारी रखी”
असे उत्तमोत्तम शेर पेश करून निष्ठा आणि प्रांजळता यांचे मूल्य सांगितले. दीपिका कटरे यांनी शृंगारिक कविता सादर केली. आत्मविश्वास अन् जिद्द या गुणांचा गौरव करताना अमित झा राही या तरुणाने,
“नही मानी हैं कभी हार न काबू आये
हमने चिरा हैं जमी को पलक छू आये”
असे बुलंद खयाल मांडले. राज अहेरराव यांनी,
“जिसने माँ बाप को जब रुलाया नही
उसको गमने कभी भी सताया नही”
या गझलेतून आई-वडिलांची थोरवी वर्णन केली; तर कांचन पाडळकर यांनी,
“मरते दम तक नही जायेगा ये इमान मेरा
बेइमानोंसे बचा लेता हैं भगवान मेरा”
या शेरातून देशभक्तीचा प्रत्यय दिला. मुशायऱ्यापूर्वी, मान्यवरांच्या हस्ते जितेंद्र राय यांच्या ‘मुक्तकंठ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हमजा खान, अकमल खान, अब्दुल्ला खान, अब्दुस्लाम इनामदार, अनिकेत गुहे, स्वप्निल अहेरराव, राजेंद्र घावटे, अरविंद वाडकर, राजेंद्र पगारे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. अब्दुल हमीद हुनर यांनी अतिशय बहारदारपणे मुशायऱ्याचे सूत्रसंचालन केले; तर मौलाना अब्दुल गफ्फार यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. आजम खान यांनी आभार मानले.