शबनम न्युज | मुंबई
मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयाला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विरोध दर्शविला आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. यामुळे गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही, असे सांगत अजित पवार यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला.
ते म्हणाले, मात्र अनेक ठिकाणी थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा आणि सभागृहात सदस्यांचे बहुमत दुसऱ्या विचाराचे असे प्रकार झाले होते. त्यामुळे शहराच्या विकासकामात आणि निर्णय प्रक्रियेत एकमत होत नाही. त्याचा परिणाम संबंधित शहराच्या विकासावर होतो. त्यामुळे कोणत्याही विषयीचा भावनिक निर्णय न घेता, तो पूर्णपणे व्यवहारी पातळीवर पडताळून घेणे आवश्यक असते. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय म्हणजे लोकशाहीला अत्यंत घातक आहे असे यावेळी अजित पवारांनी सांगितले.
थेट नगराध्यक्ष झाल्याने सदस्यांना अनेक वेळा जनहिताचे निर्णय घेणे अधिक कठीण होते. कारण थेट निवडून आल्याने नगराध्यक्ष हे नगरसेवकांना विश्वासात न घेता निर्णय घेतात.त्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शहराच्या विकासाला बसतो. त्यामुळे अडचण निर्माण होते. म्हणून या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.