शबनम न्यूज | मुंबई
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करत आहोत. पण त्या घोषणा शिंदे गटाच्या आमदारांना झोंबल्या. मी अनेक वर्षे विधिमंडळात काम करत आहे, आम्ही सत्तेवर असतानाही विरोधी पक्ष इथे येऊन घोषणा द्यायचा पण आम्ही कधी त्यांना अडवलेले नाही. आम्ही दिलेल्या घोषणांमुळे जनमानसामध्ये आपली प्रतिमा मलीन होत असल्याची शंका शिंदे गटाच्या लोकांना आली आणि आज जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांतर्फे इथे आंदोलन केले गेले, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. मराठी भाषेत म्हणतात त्याप्रमाणे चोराच्या मनात चांदणं असा प्रकार घडला, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
वास्तविक उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ओला दुष्काळ जाहीर न करता काल शेतकऱ्यांच्या तोंडाला ज्याप्रकारे पाने पुसण्यात आली त्यावर एकंदरीतच या घोषणा होत्या पण त्यातील ५० खोके, एकदम ओके ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली, ते नाराज झालेले दिसत आहेत. वास्तविक विधिमंडळात अशा गोष्टी घडत असतात, पण सत्ताधाऱ्यांच्या वागण्यातून दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्याचे निष्पन्न झाले आहे, असे अजित पवार म्हणाले.