आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग
शबनम न्युज | मुंबई
कुपोषणाच्या मुद्द्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.
राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत. मग आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते मात्र योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही, त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी सभागृहात केली.
दरम्यान, हा प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येताच जयंतराव पाटील आक्रमक झाले आणि आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.