शबनम न्युज | मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. आज मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातील घोषणा करण्यात आली.
यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी याबबातची सविस्तर माहिती दिली. संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेना नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते.