शबनम न्युज | पुणे
संत श्री आसाराम बापू यांच्या अटकेला ३० ऑगस्टला ९ वर्ष होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्ट मधून तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती ( पुणे ) साधक मंडळीतर्फे पुण्यात ३० ऑगस्ट , मंगळवार रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आणि लगतच्या जिल्हयातून आलेले सुमारे ५ हजार भक्त या मूक मोर्चात सहभागी झाले.
काळया फिती बांधून शनीवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर सकाळी साडेअकरा वाजता मूक मोर्चा ला प्रारंभ झाला. साधकांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. सर्वांनी सफेद कपडे परिधान करून दंडाला काळया फिती लावल्या होत्या आणि हातात भगवे ध्वज घेतले होते.
‘ बापूजी को रिहा करो ‘, ‘ संत न होते तो जल मरता संसार ‘, ‘नही सहेंगे अत्याचार, झूठे आरोपोंका हो बहिष्कार ‘ अशा अनेक प्रकारच्या घोषणांचे फलक साधकांनी हाती घेतले होते. न्यायालयीन प्रक्रिया संथ गतीने चालत असून न्याय मिळण्यात विलंब होत आहे, याची शासन, समाज आणि न्यायालयाने दखल घ्यावी, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे.
शनीवारवाडा, लाल महाल,फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालून राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. संयोजन समितीतर्फे प्रकाश कनोज ,जितू नंदनवार, गणेश सुर्वे, प्रसाद गाजूल, ऋषिकेश देवरे यांनी संयोजन केले.