शबनम न्युज | पिंपरी
औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड मधील उद्योगांना कुशल मनुष्यबळाची सातत्याने आवश्यकता भासत असते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून असे प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ तयार केले जात असून या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रशिक्षण घेतल्यास त्यांना निश्चितपणे रोजगार आणि स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी प्राप्त होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या नवप्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी आणि कासारवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. कासारवाडी येथे मुलींसाठी स्वतंत्र औद्यागिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे. या संस्थांच्या माध्यमातून विविध कौशल्यावर आधारित ट्रेडस शिकवले जातात. विविध ट्रेडसाठी चालू वर्षासाठी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या प्रवेशीत विद्यार्थ्यांचे दि. १ सप्टेंबर २०२२ पासून नियमित प्रशिक्षण सुरू झाले आहे. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आणि प्राचार्य शशिकांत पाटील यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक प्रकाश घोडके, ज्योत सोनावणे, शर्मिला काराबळे, निदेशक मनसरा कुमावणी, वंदना चिंचवडे, हेमाली कोंडे, सोनाली नीलवर्ण, बबिता गावंडे, योगिता कोठावदे, सीमा जाधव, सिद्धार्थ कांबळे, पूनम गलांडे, वृंदावणी बोरसे, मनोज ढेरंगे, राजकुमार तिकोणे, मंगेश कलापुरे आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी आद्योगिक प्रशिक्षण, कंपनी आस्थापना तसेच देशाबाहेरील आस्थापनांना लागणारी कुशल मनुष्यबळाची मागणीबाबत मार्गदर्शन केले. कठोर परिश्रम, नवअविष्काराची जिज्ञासा, सृजनशील वृत्ती यातून ख-या अर्थाने विद्यार्थी परिपूर्ण घडत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रशिक्षण घेऊन आयुष्याला आकार द्यावा, असे ते म्हणाले. महापालिकेच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरुणांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
कंपनी आस्थापनांना आवश्यक असणारे कौशल्य व स्वयंशिस्तीचे महत्व प्राचार्य शशिकांत पाटील यांनी सांगितले. तसेच प्रत्येक ट्रेडला असलेले महत्व व कंपनी यांना आवश्यक असणारे अष्टपैलू कुशलतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी कालांतराने स्वयंरोजगार सुरू करावा, असे देखील त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गटनिदेशक विजय आगम यांनी केले.