शबनम न्युज | मुंबई
दरवर्षी शिवसेना पक्षाकडून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येतं. पण यावेळेस शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवतीर्थावर कोण दसरा मेळावा घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरी शिवसेना आमची आहे आणि शिवतीर्थावर आम्हीच दसरा मेळावा घेणार, असं ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून म्हटले जात आहे.
या वादावरच आता शिवसेना पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. शिवसेना पक्षानं कधीही झेंडा बदलला नाही, कधीही नेता बदलला नाही. ‘एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान’ हे नेहमीच शिवसेनेचं घोषवाक्य राहिलं आहे, त्यामुळे यावर्षीही शिवतीर्थावर आम्हीच दसरा मेळावा घेणार, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.
ते म्हणाले, “कित्येक लोकांनी झेंडे बदलले, कित्येक लोकांनी नेते बदलले. पण १९६७ पासून शिवसेनेचा तोच ध्वज कायम आहे. नेतेही तेच आहेत… त्यामुळे मैदानही तेच राहणार आहे. म्हणून शिवसैनिकांच्या किंवा महाराष्ट्राच्या मनात शंका येण्याचं काहीही कारण नाही. शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा काही एका राजकीय पक्षाचा मेळावा नाही, तो महाराष्ट्राच्या विचाराचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मेळावा आहे. यादिवशी विचारांचं सोनं लुटलं जातं, त्यामुळे याबाबत संभ्रम आणि संशय असण्याचं काहीही कारण नाही” असं स्पष्ट विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.