शबनम न्युज | पुणे
पुण्यात मालमत्तेच्या वादातून ६२ वर्षीय महिलेची हत्या करून चेनसॉच्या सहाय्याने शरीराचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उषा विठ्ठल गायकवाड असे मृत महिलेचे नाव असून १० ऑगस्ट रोजी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेचा मुलगा संदीप गायकवाड (वय ४२) आणि नातू साहिल गायकवाड (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याने १० ऑगस्ट रोजी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीत आजी ५ ऑगस्ट पासून बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मृत महिलेची मुलगी शितल मनोज कांबळे हिने मालमत्तेच्या संशयास्पद वादातून तिच्या आईच्या बेपत्ता आणि संभाव्य हत्येमध्ये तिचा भाऊ संदीप आणि साहिल सहभागी असल्याचा आरोप करत पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी २८ ऑगस्टला संदीप आणि साहिल याला ३० ऑगस्ट ला अपहरण आणि गुन्हेगारी कट असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
वडील आणि मुलाची कोठडीत पोलिसांनी चौकशी केली असता, चौकशीत घर आणि सोन्याचे दागिने पीडितेच्या मालकीचे असल्याने तिने आपल्या नातवाला यापूर्वी अनेकदा घर सोडण्यास सांगितले होते. याचा राग मनात धरून आणि ५ ऑगस्ट रोजी आजी सोबत झालेल्या भांडणानंतर साहिलने आजीचा गळा दाबून खून केला तसेच संभाव्य तपासाची दिशाभूल करण्यासाठी आजीचा मोबाईल वेगळ्या ठिकाणी ठेवला तसेच खून केल्यानंतर साहिल ने एक चेनसॉ विकत घेतला आणि आजीच्या शरीराचे तुकडेही केले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी जॅक विहिरीत तसेच नदीच्या पात्रात मृतदेह फेकले, असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच २३ ऑगस्ट रोजी पोलिसांना थेऊर जवळ एक मानवी पाय सापडला होता आणि तो पीडितेच्या होता की नाही हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.