शबनम न्युज | मुंबई
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना विविध घडामोडींबाबत भाष्य केले. यावेळी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डाजी एका भाषणात म्हणाले होते की, एक देश एक पक्ष.. पण आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. संविधानावर माझा विश्वास असल्याने एक देश, अनेक पक्ष, असे माझे विचार आहेत. त्यामुळे मी भाजप नेत्यांचे मनापासून बारामतीत स्वागत करते, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. निर्मला सीतारमनजी यांचेही मी बारामतीत स्वागत करते. तेथे अनेक संस्था, शाळा खूप चांगले काम करतात, निर्मलाजींना वेळ असेल तर मी स्वतः त्यांना हे काम दाखवेन, असेही त्या म्हणाल्या. आपल्या देशात लोकशाही ही खूप महत्त्वाची आहे, प्रत्येक पक्षाला त्याची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सध्या आयटी, ईडी या केंद्रीय यंत्रणांचा वापर हा राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी होत आहे. हे एक नवीन नॉर्मल देशात सुरू झाले आहे. जे लोक आपला पक्ष सोडून भाजपमध्ये गेले त्यांची चौकशी थांबते, असे विधान भाजपचेच लोकप्रतिनिधी करतात. त्यामुळे वास्तव या देशाला दिसत असल्याचे त्या म्हणाल्या.
खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी आहे. सर्वसामान्य माणसाला अडचणी येतात तेव्हा पदयात्रा करावी लागते. मी राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे स्वागत करते व त्यांना या पदयात्रेसाठी शुभेच्छा देते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.