कनेक्टिंग ट्रस्टतर्फे जनजागृतीसाठी ‘क्रिएटिंग होप थ्रू ऍक्शन’चा पुढाकार
शबनम न्युज | पुणे
वाढती बेरोजगारी, नातेसंबंधातील तणाव, सोशल मीडियासह अन्य गोष्टीचे व्यसन, खुंटलेला संवाद, त्यातून आलेले एकाकीपण आणि नैराश्यातून थेट आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. आत्महत्येच्या या विचारापासून परावृत्त करण्यासाठी ‘कनेक्ट’ महत्वाचा असतो. गेल्या १७ वर्षांपासून आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देण्याचे काम पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था करत आहे. ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ गेल्या १७ वर्षांपासून आत्महत्या प्रतिबंधासाठी समाजात कार्यरत आहे. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव मोठा आहे, अशी माहिती कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काजरी मित्रा यांनी दिली. यंदा ‘कृतीतून अशा जागवूया (क्रिएटिंग होप थ्रू ऍक्शन) असा नारा दिला गेला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अर्णवाज दमानिया यांनी मानसिक आरोग्यात, विशेष करून आत्महत्या प्रतिबंधाचे काम करण्यासाठी २००५ मध्ये ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय आणि कायदेशीर चौकशी अशा अनुभवांचा माणसाच्या मनावर आघात होतो आणि त्यातून आत्महत्येचा विचार येतो. अशावेळी त्यांना भावनिक आधार मिळाला, मन मोकळे करता आले तर त्यातून या व्यक्ती स्वतःला सावरू शकतात, या विचाराने अर्णवाज दमानिया यांनी ही संस्था सुरु केली. विविध उपक्रमांद्वारे आत्महत्या प्रतिबंधाचे हे कार्य आजही सुरु आहे.
काजरी मित्रा म्हणाल्या, “नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय चौकशी, कायदेशीर दोषारोप /चौकशी अशा अनुभवांचा माणसाच्या मनावर आघात होतो. कोणताही पूर्वग्रह नसलेली, स्वच्छ मनाने एकून घेणारी कोणी व्यक्ती मन मोकळे करण्यासाठी मिळाली नाही, तर भावनांचा कोंडमारा होतो. व्यक्ती गुदमरून मनाने कोलमडते व ते सारे असह्य झाल्यावर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होते. तथापि जर त्यापूर्वी त्यांना मन मोकळे करता आले, भावनांचा निचरा झाला व भावनिक आधार मिळाला तर अशा व्यक्ती सावरू शकतात व टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त होऊ शकतात आणि एक जीव वाचू शकतो. या करिता ‘कनेक्टिंग’तर्फे डिस्ट्रेस हेल्पलाईन चालू करण्यात आलेल्या आहेत. ९९२२००४३०५/९९२२००११२२ या क्रमांकांवर तणावग्रस्त व्यक्ती बोलू शकतात. आठवड्याचे सातही दिवस, दुपारी १२ ते रात्री ८ संपर्क करता येतो.”
कॉम्प्यूटरचे युग असल्याने ई-मेल द्वारे मदत मागण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिलेला आहे. connectingngo@gmail.com या ई-मेलद्वारे सल्लाही दिला जातो. दोन्ही प्रकारात ओळख व माहिती गुप्त ठेवली जाते, असे त्यांनी नमूद केले.
तणावग्रस्तांना भावनिक आधार देण्याबरोबरच आत्महत्येचा प्रयत्न करूनही वाचलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि आत्महत्या घडलेल्या घरातील व्यक्ती आणि त्यांच्या आसपासची कुटुंबे यांनाही धक्का बसलेला असतो व सावरण्यासाठी आधाराची गरज असते, हे ओळखून ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ने ‘सर्वायव्हर सपोर्ट’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे. अशा अस्वस्थ व्यक्तींनी ८४८४०३३३१२ या नंबरवर एसएम्एस पाठवावा. स्थेकडून त्यांना फोन येतो व फोनवर बोलण्याची वेळ ठरवली जाते. ही सेवा दर बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी उपलब्ध असते, असे काजरी मित्रा यांनी सांगितले.
तरुण पिढीत असणारे आत्महत्येचे प्रमाण बघता, तिथे प्रतिबंधात्मक काम करण्याच्या दृष्टीने शाळांमधून ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी समवयस्क प्रशिक्षक (peer educator) कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एकमेकांना भावनिक आधार देण्याची संकल्पना व महत्व समजावून सांगितली जाते. शाळांच्या जोडीने अशाच स्वरूपाचे जनजागृती कार्यक्रम समाजातील इतर घटकांसाठीही विविध स्तरांमधे ठिकठिकाणी वेळोवेळी घेतले जातात. त्यातून दोन संदेश दिले जातात. एक म्हणजे आत्महत्येचा विचार क्षणिक नैराश्यापोटी येतो. आणि त्यासाठी मदत घ्यावी. ती उपलब्ध आहे. या बरोबरच आत्महत्येविषयी असलेले समज गैरसमज याबद्दलही चर्चा होते.
गेल्या दीड वर्षात कोरोनाने अनेकांचे स्वकीय हिरावून नेले. अनेकांचे रोजगार गेले. उद्योग/व्यवसाय बंद पडल्याने भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळाले. परीक्षा पास झाल्या पण शिक्षण नीट झाले नाही. औषधोपचारांवर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागल्याने अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. त्यातच लॉक डाऊन लागले. माणसे कामावर न जाता घरातूनच काम करू लागली. त्यातून कौटुंबिक ताण तणाव / कुरबुरी/संघर्ष वाढले. सततचा तणाव, त्यातून येणारी हतबलता आणि त्यामुळे अखेर अपराधीभाव यांचे पर्यवसन – नैराश्य. यातून लोकांना बाहेर येण्यास मदत करण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्ट सकारात्मकता पेरण्याचे काम अविरत करीत आहे. विनामूल्य हेल्प लाईन हा संवाद करून आत्महत्या प्रतिबंध करण्याचा परिणामकारक मार्ग ठरला आहे.
• डिस्ट्रेस हेल्पलाइन प्रोग्राम: ज्यांना कोणत्याही प्रकारचा ताण आहे ते हेल्पलाइन क्रमांक ९९२२००४३०५/९९२२००११२२ यावर फोन करून बोलू शकतात किंवा connectingngo@gmail.com या ईमेल वर लिहू शकतात. ही हेल्पलाइन आठवड्याचे सातही दिवस दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत चालू असते.
• सर्व्हायवर सपोर्ट प्रोग्राम: ज्या व्यक्ती आत्महत्येच्या अनुभवातून गेल्या आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा असून, त्यांना ८४८४०३३३१२ या नंबरवर एसएमएस करता येतो. त्यांना संस्थेकडून फोन येतो. ही सेवा दर बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी चालू असते.
• पियर एज्युकेटर प्रोग्राम: हा कार्यक्रम ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमधे चालू असतो.
• अवेरनेस (जनजागृती) प्रोग्राम: हा कार्यक्रम समाजातल्या प्रत्येक घटकांना आत्महत्येविषयी जागरूक करतो.
या सर्व सेवा मोफत आहेत. संस्थेचे स्वयंसेवक लोकांना सहानुभूतीने, निरपेक्षपणे ऐकून घेऊन भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात काळजी, भीती, नैराश्य, आत्महत्येचे प्रयत्न, आत्महत्येतुन मृत्यू यांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेले दिसते. या सगळ्याचा परिणाम डिस्ट्रेस हेल्पलाइनच्या कॉल आणि ईमेलच्या संख्येत वाढ झाली आहे. मागच्या एका वर्षात या हेल्पलाइनवर स्वयंसेवकांनी २४२७ कॉलस् आणि ७१७ ईमेलला उत्तर दिले.
सर्व्हायवर सपोर्ट प्रोग्राम हा फील्ड प्रोग्राम आहे. यामध्ये संस्थेतील स्वयंसेवक हॉस्पिटल आणि वस्ती भेटीतून आत्महत्या अनुभवलेल्या व्यक्तींना भावनिक आधार देतात. परंतु कोरोनामुळे हॉस्पिटल आणि वस्ती भेटी काही प्रमाणात बंद झाल्या. सप्टेंबर २०२० पासून या कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवेकानी फोनद्वारे आत्महत्या अनुभवलेल्या जवळपास २०० व्यक्तींपर्यंत पोचून त्यांना भावनिक आधार दिला. पियर एज्युकेटर प्रोग्राममध्ये ऑनलाइन स्वरूपात तीन शाळांच्या माध्यमातून ९२० विद्यार्थी, १७८ पालक, आणि १२० शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यातून १६० विद्यार्थी पियर एज्युकेटर म्हणून त्यांच्या मित्रांना भावनिक आधार देण्यास तयार झाले. जनजागृती कार्यक्रमातून २९७६ लोकांपर्यंत आत्महत्या आणि तणावाच्या परिस्थितीत स्वतःची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. संस्थेतील स्वयंसेवकांचे अथक परिश्रम आणि समर्पणामुळे शक्य झाले.
“एक जीवन वाचवणे खूप समाधान देऊन जाते. बऱ्याच लोकांना आधाराची गरज असते. आपण सर्वानी एकमेकांशी हात मिळवत, आधार देत जीवन वाचवण्याचा प्रयत्न करूया. आत्महत्या अनुभवलेल्या, त्रासात, वैफल्यात असलेल्या लोकांना भावनिक आधार देण्यासाठी किंवा आत्महत्येविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी संवेदनशील, दुसऱ्यांप्रती अनुकंपा आणि धैर्य असलेल्या लोकांची गरज असते. असे लोक एकत्र आले, एकमेकांशी 'कनेक्ट' झाले, तर अनेकांना आपण आत्महत्येपासून परावृत्त करू शकतो."
आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्ट व्हा -
या चळवळीत आणखी लोकांनी येण्याचे आवाहन अर्णवाज दमानिया यांनी केले आहे. अधिकाधिक लोकांना भावनिक आधार देऊन त्यांना आत्महत्येच्या विचारांपासून दूर नेण्यासाठी आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्टिंग ट्रस्टबरोबर काम करू इच्छिणाऱ्यांनी श्री. अक्षत भयाणी यांना ७०३०२३००३३ वर संपर्क साधावा.
Advertisement