शबनम न्युज | बीड
सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्रामात लाभलेले वडीलधाऱ्यांचे योगदान याबाबतची माहिती नव्या पिढीला द्यावी. या अनुषंगाने राज्य सरकारने काही कार्यक्रम घ्यायला हवे होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथे झेंडावंदन करून ते हैदराबादला निघून गेले. वास्तविक हैदराबादला मोठा कार्यक्रम घेण्यापेक्षा मुंबई अथवा औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एखादा कार्यक्रम घेणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही, अशी नाराजी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर व्यक्त केली. बीड येथे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला.
पुढे अजित पवार म्हणाले की, ज्याप्रमाणे देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना जो सहभाग जनतेने घेतला, त्या पद्धतीचा कार्यक्रम मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारलाही घेता आला असता, त्या करिता राज्य सरकारने उपसमिती स्थापन केली होती. मात्र दुर्दैवाने आताच्या राज्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज आहे त्या पद्धतीने लक्ष दिले जात नाही, अशी टीका अजितदादांनी केली. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही. मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने राज्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठवाड्यातील जनतेच्या मागण्या लक्षात घेऊन उर्वरीत दिवसात त्या प्रमाणे काम करावे, अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी केली.