शबनम न्युज | मुंबई
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचे होमवर्क बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यावर पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री केसरकर यांच्याकडे मागणी केली आहे कि, होमवर्क बंद करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने गोट्या, भवरे अशी खेळण्याची साधने पुरवावी, विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाच नाही तर त्यांची बौद्धिक क्षमता वाढणार नाही, बौद्धिक विकास खुंटण्याच्या प्रक्रियेला वाव मिळेल, तरी विद्यार्थ्यांचा होणारा गृहपाठ बंद करू नये, अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा गृहपाठ (होम वर्क) बंद करायचा विचार राज्य सरकार करत आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांनी सांगितले आहे याबाबत वृत्तवाहिन्या , वर्तमानपत्रे यात वाचण्यात आले. गृहपाठ बंद म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगिण तसेच बौध्दिक विकास खुंटविण्याच्या प्रकाराला वाव देण्याचे कारणं ठरेल. शाळा,शालेय अभ्यासक्रम, पाठ्यवस्तू, शिक्षक आणि पालक यांना जोडणारा दुवा म्हणजे गृहपाठ तो पूर्ण करण्यासाठी घरात शैक्षणिक वातावरण तयार होवून विद्यार्थी पालक सुसंवाद साधला जातो. तो बंद करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे असा प्रकार होऊ शकतो . ‘गृहपाठ बंद‘ ही पालकांसाठी आनंदाची बातमी खचितच नाही. उलट घरचा अभ्यास देण्यासाठी पालकांचाच आग्रह असतो.काही मुलंदेखील ‘घरचा अभ्यास द्या‘ असे शिक्षकांना म्हणतात आणि आवडीने अभ्यास पूर्ण करून आणतात. आजही अनेक मराठी शाळेत गृहपाठ आवडीने पूर्ण करणारे विद्यार्थी आहेत जे फक्त घरी अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहे. थोडक्यात गृहपाठ ( होम वर्क ) हा मध्यमवर्गीय विद्यार्थी यांच्या उजळणीचा किंवा अभ्यासाचा पाया आहे.
शाळामध्ये विद्यार्थी शिकतात मग घरी येऊन परत त्यांना अभ्यासाचा गृहपाठ याचा ताण येतो म्हणून दुसरे टोक गाठून एकदम गृहपाठच बंद करणे अजिबात उचित होणार नाही. अभ्यासक्रम किंवा गृहपाठाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे. प्रश्नोत्तरे या साच्यातून गृहपाठ बाहेर काढून त्यात रंजकता, नावीन्य आणणे आवश्यक आहे. मुलांना लिहिताना मजा वाटेल, विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन देता येईल असे गृहपाठ देता येणे शक्य आहे. असे अनेक शिक्षणतज्ञ , शिक्षक यांचे म्हणणे आहे.याचा विचार सरकार यांनी करावा तसेच मागील २ वर्षात कोविड काळात ऑन लाईन शिक्षण यामुळे
मुलांच्या लिहिण्या-वाचण्याची गती मंदावलेली आहे हेही लक्षात घ्यायला हवे. समजा, ‘आम्हांला शाळेचा वैताग येतो‘ असे मुलांनी संघटित होऊन सांगितले तर शाळाच बंद करणार का? याचा विचार सरकार किंवा शिक्षणमंत्री यांनी करायला हवा.सरकार, मंत्री किंवा अधिकारी बदलले की धोरण बदलते. धोरणातील ही धरसोडवृत्ती शिक्षणाला बाधक ठरते आहे. कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी किंवा निर्णय घेण्याआधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक शिक्षण तज्ञ यांच्या सोबत चर्चा केली पाहिजे. खूप समजून उमजून शिक्षण क्षेत्रातले निर्णय घेतले पाहिजेत. कारण प्रश्न लाखो मुलांच्या आयुष्याचा आणि भविष्याचा आहे.
तरी सदर निवेदनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , दिपक केसरकर साहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आपणांस विनंती आहे की , पहिली ते चौथीच्या विद्यार्थी यांना देण्यात येणारा गृहपाठ ( होम वर्क ) बंद करण्यात येऊ नये. गृहपाठ बंद म्हणजे विद्यार्थी यांच्या बौध्दिक विकास खुंटुण्याच्या प्रक्रियेला वाव देण्याचे कारण ठरेल तरी सदर निर्णय मागे घेण्यात यावा व विद्यार्थी यांच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यासाठी शिक्षक , शिक्षण क्षेत्रांतील तज्ज्ञ व पालक संघ यांच्या सोबत बैठक घेऊन त्याच्या मान्यतेने योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असेही सदर निवेदनात कोल्हटकर यांनी नमूद केले आहे.